घन:श्याम कडू
उरण : घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या केबल खराब झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तरी सदर दुरुस्तीचे कासम लवकरात लवकर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.
घारापुरी बेटावर वीज पुरवठ्यासाठी २०० केव्हीए रोहीत्राद्वारे समुद्राखालून टाकण्यात आलेल्या आहेत. त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी दुरुस्तीच्या कामासाठी हात वर केल्याने महावितरणकडून वीज वाहिन्या दुरुस्तीच्या कामाच्या वेळेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. वीजपुरवठा पुर्ववत होईपर्यंत अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे.
मागील महिन्यापासून वीजेच्या संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे बेटावरील उघड्या वाहिन्या आणि नादुरुस्त डीपीमुळे नागरिक, जनावरांना वीजेचा धक्का लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. घारापुरी बेटावर वीजेची समस्या निर्माण झाल्याने रहिवाशांवर वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.
थ्री-फेज सप्लाय नसल्याने पाणी पुरवठा करण्यासाठी नाईलाजाने घारापुरी ग्रामपंचायतीला सध्या जनरेटरचा वापर करावा लागत आहे.यामुळे ग्रामपंचायतीला अतिरिक्त खर्चाचा नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली. दुसऱ्या ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती पनवेल महावितरण विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस.ए.सरोदे यांनी दिली. परंतु जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत घारापुरी ग्रामस्थांना अंधारात चाचपडत रहावे लागणार आहे. तरी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे