मजिद हजिते
माणगाव : शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावरील रिळे आणि पाचोळे या दोन गावांच्या मधील शेकडो एकर जमिनीच्या पठारावर निसर्गाने पिवळसर चादर ओढल्याने जणू सोनेरी शालूला हिरवीगार किनार जोडली आहे असे निसर्गरम्य चित्र दिसत आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहिले तर अद्भूत निसर्गाच्या चमत्काराने नजरेत भरेल एवढे निसर्गाने मुक्तहस्ते सोन्याचा पित मुलामा देऊन उधळण केल्याच्या मनमोहक तरंग दिसतात.



संपूर्ण सपाट परीसरात सोनेरी-पिवळी छोटी-छोटीशी फुले लक्ष वेधून घेतात. ही छोटी फुले वाऱ्यावर डोलताना सुंदर आणि रुपवान स्त्रीच्या साडीचा पदर हळूवारपणे अलगद पूढे सरकत असल्याचा भास होतो. सुसाट वारा सुटला तर समुद्रातील लाटा अंगावर येत असल्याचा आनंद हा विरळाच म्हणावा लागेल. या परीसरात हि पिवळी बहारदार फुले कवळा या लहानग्या वनस्पतीची विखुरलेली आहेत. तसेच अनेक आकर्षक विविध प्रकारची फुले उगवलेली आहेत. रानभाज्या आणि औषधी भाज्या पहावयास मिळतात. विविध रंगांची फुलपाखरे येथे वावरताना दिसतात. शहरात असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते.


या जागेवर एकाच प्रकारची पिवळसर सोनेरी पैठणी गुंफून निसर्ग मातेने एकाच ठिकाणी नक्षीकाम केलेले पाहताना मन मोहवून गेल्याशिवाय राहत नाही. पहाटे आणि सकाळी या कोमल फुलांवर पडलेले दवबिंदू हे चकचकीत हिऱ्यांच्या कोंदण पाडलेले सुंदर स्वप्न वाटते. या पावसाळ्यात पावसाचे थेंब पिवळी आणि हिरव्या पानांवर ओघळताना दिसल्यावर आई आपल्या लहानग्या बाळाला जणू आंघोळ घालताना जसे पाण्याचे तुषार आजूबाजूला उडताना दिसतात तसंच काहीसं चकचकीत पाणीदार हिरे-माणिक टपाटप पडताना दिसत असतात. त्यातच वाऱ्याची मंद झुळूक अंगावर शहारे आणून मानवी शरीराला प्रसन्न करतात.
रिळे आणि पाचोळे गावाला निसर्गाने भरभरून दान दिल्याने या निसर्गरम्य परिसरात विविध प्रकारच्या जैवविविधता आढळून येते. सकाळी मोर आणि लांडोर या प्राण्यांच्या गोड आवाजाने निरव शांततेत अधिकच आनंदाची भावना होते. आजुबाजूला असलेल्या वनश्री परीसरात विविध पक्षांचे आवाज सतत रुंजी घालत असतात. सकाळची कोवळी उन्हाची तिरीप आणि किरणं या पिवळ्या फुलांवर पडल्यावर ती फुले फुलराणी सारखी दिसतात. ते दर्शन मनाला भुरळ घालते. सकाळीच पक्षांची मंजुळ किलबिल, पोपटांचे विठ्ठू विठ्ठू, कोकीळेचे कुहूकुहू, चिमुकल्या चिमण्यांची चिव चिव, कावळ्यांचे काकरव, कोंबड्यांची बांग, गायीच्या वासराचा हंबरडा हे सारं आल्हाददायक वातावरण एक वेगळीच उर्जा निर्माण करीत असतात. येथील विविध प्रकारची वृक्षवल्ली शुद्ध हवा मुक्तपणे संवाद साधताना मन मोहवून मन टवटवीत आणि तरतरीत करतात.


मात्र रिळे आणि पाचोळे या गावांना दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे धोका निर्माण होतो. काही दिवस हे सोनेरी पठार पाण्याखाली जाते. त्यामुळे या गावांचा माणगावशी असलेला संपर्क तर तुटतोच परंतु येथील नैसर्गिक जैवविविधता मरणासन्न अवस्थेतून जात असते. त्याला जीवदान दिले तर निसर्गाच्या साधनसंपत्तीत अधिक वाढ होऊ शकते. तसेच पारंपरिक भातशेती, भाजीपाला, कडधान्ये अधिक जोमाने घेता येतील. शासनाने या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवून रुंदीकरण केले तर हे निसर्गाचे वरदान आणि देणं पाहण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टबरपर्यंत येथे येऊ शकतील. कारण ही निसर्ग संपदा आणि सौंदर्य याच काळात दिसते. तसेच येथील सुर्योदय शिवरायांच्या रायगड किल्ल्याचे दर्शन घडवून स्फुरण चढवते आणि सुर्यास्त मनाला समाधान देते.