विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड, खांब, सुकेळी खिंड, वाकण येथे रस्त्यात गुरे उभी अथवा बस्तान मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असुन याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोहा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या जवळील शेतजमिनी मुंबई, पुणे दिल्लीकडील धनिकांना विकल्या असुन गेली दहा ते बारा वर्षापासुन जमिनी विकण्याचा व्यवसाय जोमाने सुरु आहे. यातच आपल्याकडील शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली बिनकामी गुरे मोकाट सोडली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील शेतजमीन मुंबई, पुणे तसेच दिल्लीकडील धनिकांना तसेच खाजगी कंपनीला विकल्याने संबंधित मालकांनी विकत घेतलेल्या शेती भोवती तारेचे कुंपण घातले आहे. यामुळे शेती विकलेल्या शेतकऱ्यांची गुरे चरण्यासाठी जागा राहिली नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी गुरे मोकाट सोडली असुन ही गुरे मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध बस्तान मांडून बसत आहेत. यामुळे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे तर कधीकधी वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघात होताना दिसत आहेत.
अशातच गुरांना अपघात होऊन गुरे जखमी झाली तर गुरांचा मालक येऊन भरपाई मागत आहे. परंतु, या गु्रांमुळे अपघात होऊन एखादा प्रवाशी जखमी झाला तर गुरांचा मालक येथे फिरकत देखील नाही. अशा मोकाट गु्रांचा बंदोबस्त संबंधितांकडून करण्यात यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.