विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप ठरले
भाजपा १२६, शिंदे गट ९०, राष्ट्रवादी अजित पवार ७२
मिलिंद माने
मुंबई : सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर लढली जात असताना राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील जागावाटप अंतिम झाले असून महायुतीने जागा वाटप करताना तिन्ही पक्षांनी ९ आकडा हा अंतिम केला असून त्यानुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीमधील जागा वाटपामध्ये भाजपा १२६ शिंदे गट ९० व अजित पवार गट ७२ अशा पद्धतीने जागावाटप झालं आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी विधानसभेच्या २८८ जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबाबत दिल्लीतील भाजप नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यामध्ये बोलणी करून अंतिम केले असून याबाबतची अधिकृतरित्या घोषणा जाहीरपणे येत्या दोन दिवसात होणार आहे
जागा वाटपात मोठा भाऊ भाजपच!
राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांमधील जागावाटप करताना मोठा भाऊ हा भाजपच राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आलेल्या जागेवरच समाधान मानावे लागणार आहे. शिवसेना शिंदे गटाने शंभरच्या वर जागांची मागणी केली होती. मात्र, शिंदे गटाला ९० जागा पदरात पडल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील ८० ते ८५ जागांची मागणी केली होती. मात्र अजित पवारांना देखील ७२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर मोठा भाऊ असलेल्या भाजपाने मात्र मागच्या निवडणुकीत १०६ जागांवर विजय संपादन केला होता. त्या भाजपाने आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत १२६ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन १२६ जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यामुळे राज्यात भाजप हाच मोठा भाऊ असल्याने शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही गटांना मात्र केंद्रीय भाजपाने दिलेल्या जागांवरच समाधान मानावे लागले आहे
राज्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीची आचारसंहिता सोमवार, १४ ऑक्टोबरपासून लागण्याचे संकेत प्राप्त होत असताना राज्यातील महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत अद्याप कोणी किती जागा लढायच्या यावर महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांची बोलणी चालू आहेत, मात्र, त्याच दरम्यान महायुतीमधील भाजपा, शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांना मात्र भाजपाने दिलेल्या जागांवरच एकंदरीत समाधान मानावे लागणार आहे. मात्र याचा खरा फटका शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांना बसणार आहे, कारण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी या दोन पक्षांमधील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. त्यांचा मात्र हिरमोड होणार आहे. तशीच अवस्था २०१९च्या मागील विधानसभा निवडणुकीत थोड्याफार मताने पराभूत झालेल्या भाजपाच्या त्या उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत देखील शिंदे गट व अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामुळे तिकीट मिळणार नसल्याने भाजपात देखील काही प्रमाणात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार असल्याचे संकेत महायुतीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
९ आकडा शुभ संकेत का?
राज्यातील विधानसभा निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार असो की, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते थेट ग्रामपंचायतच्या. निवडणुकीसाठी उभे राहणारे उमेदवार असो प्रत्येक उमेदवार आपल्या मोबाईल क्रमांकापासून ते वाहनाच्या क्रमांकापर्यंत ते थेट उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत सर्वजण शुभ अंकापासून सुरुवात करतात त्याचप्रमाणे राज्यातील महायुतीमधील भाजपा, शिंदे गट व अजित पवारांची राष्ट्रवादी या सर्वच सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप करताना शुभ आकडा प्रमाण धरून ९ आकड्याला प्राधान्य दिल्याचे प्राप्त माहितीवरून दिसत आहे. एकंदरीत ९ आकडा हा महाविकास आघाडीला सत्तेच्या सारीपाटापर्यंत नेईल की नाही याचे गणित विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल.