मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून कोकणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याचबरोबर, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या, गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
विधान भवन परिसरात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ‘राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज आहेत. सकाळपासूनच मी मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीनं मदत व बचाव कार्य सुरू करावं अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
‘राज्यात जिथं-जिथं आवश्यकता आहे, तिथं एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महापालिका, जिल्हा प्रशानाच्या सर्व यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यतकता भासेल तिथं मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लोकांना त्रास होऊ नयेत या दृष्टीनं सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालय लवकर बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्यात आलं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हवामान विभागाकडून अलर्ट मिळाल्यावर नागरिकांनीही सावध राहावं. रेड, ऑरेंज अलर्टनुसार सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घ्यावी. अतिवृष्टीच्या ठिकाणच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं. प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
I am safety personnel.If any help required
by any body or Govt.agency, aI will extend my help without any cost.