• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सिडको संपादित जमीन खोटे दस्तऐवज बनवून संगनमताने दोन कोटींना विकली

ByEditor

Oct 22, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
उलवे नोडमधील गव्हाण विभागात सिडकोने संपादित केलेली १६ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवून ती जमीन नवी मुंबईतील सारसोळे गावातील एका व्यक्तीस सुमारे दोन कोटी रुपयांना परस्पर विकल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शेकापचे नेते पांडुरंग घरत तसेच भाजपचा गव्हाण ग्रामपंचायतीचा उपसरपंच अमर केसरीनाथ म्हात्रे यांच्यासह पनवेल तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच या खोट्या दस्तची नोंदणी करणारे सब रजिस्टार यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र दोन कोटींची फसवणूक झाल्याने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या कैलास शंकर म्हात्रे यांची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याने आता न्याय मागण्यास सदर तक्रारदार उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत

नवी मुंबईतील सारसोळे गावात राहणाऱ्या कैलास शंकर म्हात्रे यांना पनवेल परिसरात जमीन खरेदी करायची होती. याची कल्पना त्याचे नातेवाईक अमर केसरीनाथ म्हात्रे यांना असल्याने त्याने गव्हाण गावातील शेकापचे ज्येष्ठ नेते पांडुरंग घरत व संतोष सावळाराम भगत यांच्यासह संगनमत करून पांडुरंग घरत यांनी सिडकोने संपादित केलेल्या सर्व्हे नंबर ३४ हिस्सा नंबर ९ या सोळा गुंठे जमिनीची बोगस कागदपत्रे स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी तसेच पनवेलचे तत्कालीन तहसीलदार यांच्या मदतीने तयार करून सदर जमीन कैलास म्हात्रे यांना परस्पर विकली.आर्थिक स्थिती नसतानाही कैलास म्हात्रे यांनी ही कागदोपत्री मिळकत २०२१ साली विकत घेतली.या जमिनीचे रजिस्ट्रेशन सुद्धा पनवेल येथील सब रजिस्ट्रार कडे करून या मिळकतीचा सात बारा उतारा सुद्धा कैलास शंकर म्हात्रे यांच्या नावाने तयार केला.मात्र त्यांना जागेचा ताबा दिला नाही. तदनंतर कैलास म्हात्रे यांना या जमिनीवर बांधकाम करायचे असल्याने त्यांनी पांडुरंग घरत यांनी मला माझी जमीन मोजून ताब्यात देण्याची मागणी केली.मात्र पांडुरंग घरत यांनी नेहमी चालढकल केल्याने कैलास म्हात्रे यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत सिडको कार्यालयात विचारणा केली असता. सदर जमीन ही सिडको संपादित असून त्या जमिनीचे भूखंड सुद्धा पांडुरंग घरत यांनी सिडको कडून घेतल्याचे समोर आले आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कैलास म्हात्रे यांनी अमर म्हात्रे या मध्येस्थाला मला माझे पैसे परत करण्याची मागणी केली मात्र हे खोटे प्रकरण पांडुरंग घरत,संतोष घरत व अमर म्हात्रे यांनी संगनमत करून पैसे वाटून घेतल्याने त्यांनी कैलास म्हात्रे यांचे पैसे देण्यास नकार देऊन तुला काय करायचे ते कर…आमच्या हातात शासकीय यंत्रणा आहेत असे मुजोरीत सांगितले.त्यानंतर कैलास म्हात्रे यांनी झालेल्या फसवणुकी विरुद्ध शेकापचे युवा नेते राजेंद्र पाटील यांच्या मदतीने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला.

न्हावा शेवा पोलीस तक्रार घेत नसल्याने आता मुंबई उच्च न्यायालयात या विरुद्ध न्याय मागणार असल्याचे शेकापचे युवा नेते राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!