• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जयंत पाटलांचा चौकार! रायगडच्या चार जागांवरील शेकापचे उमेदवार जाहीर

ByEditor

Oct 22, 2024

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस यांनी रायगडमधील अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शेकापनं चार उमेदवार जाहीर केले आहेत. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. जयंत पाटील यांनी पेण सुधागड, उरण, पनवेल आणि अलिबाग या चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.

शेकापच्यावतीनं अलिबागमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अपेक्षेप्रमाणं शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील चार मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अलिबागमधील शेतकरी भवन परिसरात शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शेकापच्या सभेत महिलांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला चित्रलेखा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, अतुल म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी उमेदवारांची घोषणा करताना अलिबाग-मुरुड मतदारसंघातून चित्रलेखा पाटील, पेण मतदारसंघातून अतुल म्हात्रे, पनवेल मतदारसंघात बाळाराम पाटील, उरणमधून प्रीतम म्हात्रे यांची नावे जाहीर केली. तर सांगोला मतदारसंघासाठी बाबासाहेब देशमुख यांचे नाव जाहीर केले. अलिबागमधील शेतकरी भवनमधून जयंत पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसमोर ही घोषणा केली. जयंत पाटील कोणती घोषणा करणार याची सर्वांना उत्सुकता होती, त्यामुळे सकाळपासून कार्यकर्त्यांची रिघ अलिबागच्या दिशेने लागली होती. दरम्यान, 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली आणि आजपासून (22 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. तरीही महाविकास आघाडीत अजून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे, उमेदवार जाहीर होण्याचे नाव दिसत नाही त्यामुळे शेतकरी कामगार पक्षात काहीशी नाराजी आहे. शिवाय शेकापला अपेक्षित जागा मिळत नाहीत, अशीही चर्चा सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!