घनःश्याम कडू
उरण : उरणच्या विकासात आजतागायत महत्वपूर्ण भूमिका ही माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांची आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र आजचे नेतेमंडळी न केलेल्या कामांचेही श्रेय लाटून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नेतेमंडळीकडून आपण उरणचा विकास कसा केला याचा धिंडोरा पिटत मतदारांकडून मतांचा जोगवा मागत आहेत. आजपर्यंत उरणचा विकास झाला की भकास झाला हे व्हायरल होणार्या पोस्टवरून दिसत आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी शासकीय पातळीवर होत असतानाही ती आपणच आणल्याचा दावाही आताचे नेते मंडळीकडून केला जातो. कोणतीही शासकीय योजना अथवा प्रकल्प हा काही काही महिन्यात होत नसतो, त्यासाठी कित्येक वर्षे लागत असतात.
राज्याचे मुख्यमंत्री असताना दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचा मानस होता. त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलून त्याची पूर्तता करण्याचा सपाटा लावला होता. परंतु काही नतद्रष्ट नेत्यांना रायगडचा विकास होत असल्याने पोटदुखी सुरू झाली. त्यांनी एकत्र येत बॅरिस्टर अंतुले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्यात विरोधक यशस्वी झाले. यानंतर काही वर्षातच सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. बॅरिस्टर अंतुले हे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते तर नक्कीच रायगडचा कॅलिफोर्निया होऊन आजच्या घडीला मंत्रालय हे उरण द्रोणागिरी नोडमध्ये असते. तसेच करंजा रेवस हा पूल कधीच उभारला असता. उरणमध्ये सुसज्ज हॉस्पिटल, मैदान व इतर सोयीसुविधांनी उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने नक्कीच झाला असता. येथे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून बेरोजगारी हटविण्यास मदत झाली असती.
बॅरिस्टर अंतुले यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून उरणच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे विरोधकही मान्य करतात. त्यांनी उरणमध्ये जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, एनएडी असे अनेक प्रकल्प आणून येथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून दिला आहे. याचा त्यांनी कधीच गवगवा केला नाही. मात्र आताचे राजकारणी स्वतः न केलेल्याही कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. आता तर विधानसभा निवडणुकीत विकासाचा धिंडोरा पिटत मतांचा जोगवा मागतील. मात्र निवडणुका झाल्यानंतर उरणचा विकास होण्याऐवजी उरण भकास होत चालल्याचे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे.