गणेश पवार
कर्जत : बदलापूर अंबरनाथ लोकलच्या संख्येत वाढ होत नसल्याने दिवसेंदिवस कर्जत लोकलमधील वाढणारी प्रवाशांची संख्या व त्यामुळे होणारी गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून अपघात होणाऱ्या समक्षांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा गर्दीमुळे कर्जतमधील २५ वर्षीय ऋतुजा जंगम या तरूणीचा कर्जतकडे येणाऱ्या अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी ठाणे रेल्वेस्थानकामधून कर्जतकडे घरी परतण्यासाठी कर्जत म्हाडा कॉलनीमध्ये राहणारी २५ वर्षीय ऋतुजा जंगम ही तरूणी कर्जत लोकल पकडून या लोकलमध्ये गर्दी असल्याने दरवाज्यामध्ये उभी राहून प्रवास करीत होती. या प्रवासा दरम्यान कर्जत लोकल ही अंबरनाथ रेल्वेस्थानक येताच ऋतुजा जंगम ही स्थानकात उतरून प्रवासी उतरल्यानंतर पुन्हा लोकलमध्ये चढून लोकल ट्रेनच्या दरवाज्यातील लोखंडी खांबाला पकडून उभी होती. लोकल ही बदलापूर रेल्वे स्थानकाकडे निघाली असता, बदलापूर रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ऋतुजा जंगम ही तरूणी लोकल ट्रेनमधून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. उपचाराकरीता ऋतुजा जंगम या तरूणील उल्हासनगर मधील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ऋतुजा या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऋतुजा जंगम या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू हा लोकल ट्रेन मधील क्षमतेपेक्षा वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे एक जिवंत उदाहरण आहे. अंबरनाथ बदलापूर तसेच कर्जत लोकलमध्ये वाढती गर्दी पाहता असे घडणारे अपघात रोखण्याप्रती लोकल ट्रेनची क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी व प्रवाशी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाकडे वारंवार करण्यात येत आहे.
हे नियोजन कागदावरच दिसून येत असुन, प्रत्यक्षात असलेले शुन्य नियोजन तर अंबरनाथ बदलापूर येथील वाढते नागरिकरणामुळे रेल्वे प्रवासी यांची वाढती संख्या व त्यामुळे होणारी गर्दी पाहाता बदलापूर, अंबरनाथ लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ होत नसल्याने बदलापूर अंबरनाथ येथील रेल्वे प्रवासी हे कर्जत लोकल ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने कर्जत, वांगणी , नेरळ, भिवपूरी, कर्जत, खोपोली येथील रेल्वे प्रवाशांना गर्दीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे या वाढत्या गर्दीच्या कारणामुळेच कर्जतच्या २५ वर्षीय ऋतुजा जंगम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचेही रेल्वे प्रवाशांकडून बोलले जात आहे. अशा घटना रोखण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रवासींकडून रेल्वे पॅसेंजर असोसिएशन व संबंधित रेल्वे अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे प्रवासींकडून केले जात आहे. २५ वर्षीय ऋतुजा जंगम हिच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे कर्जतकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.