वाळवटी विभाग अंतर्गत २३ गावे अंधारात
महावितरण अधिकारीच बेजबाबदार
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी विभाग अंतर्गत असणारे अनेक गावे तासनतास अंधारात असतात. सद्या ऑक्टोंबर हिट असतानाच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. मात्र, हा दिवस-रात्र होणारा त्रास गेल्या दोन अठवड्यापासुन सुरु असल्याने येथील नागरिक वैतागले आहेत. तालुक्यातील गावोगावी सुरळीत सेवा देण्यासाठी तयारीचा दावा करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे पितळ नेहमी उघडे पडत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी परिसरात अनेक भागांसह ग्रामीण भागातील २३ गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.
कार्ले, दांडगुरी, नागलोली, वाळवटी, मेघरे या गावांच्या परिसरातील एकूण तेवीस गावांत विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. ही गावे आड मार्गावर असून तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या गावांना विद्युत रात्रंदिवस विजेची गरज असताना, मात्र, दिवसातून पाच मिनिटे लाईट असला तर काही वेळात बंद होतो. ‘महावितरण’च्या वितरण व्यवस्थेतील काही त्रुटींप्रमाणेच या वेगवेगळ्या यंत्रणांच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.
पावसाळा देखील संपत आला मात्र, पावसाळी दिवस आहेत त्यामुळे वीज गायब होते अशी कारणे अद्याप पुढे केली जात आहेत. काही वेळा सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज बंद केली जाते. मात्र, बहुतांश वेळा यंत्रणेतील बिघाडामुळे वीज जाण्याचे प्रकार होत असतात. वीजउपकेंद्र, रोहित्रांमध्ये बिघाडही होतात. दुरुस्ती व देखभालीच्या कारणास्तव कोणत्याही विशिष्ट दिवशी कामे केली जात नाही, अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानी प्रमाणे वीजपुरवठा नियमित बंद केला जातो. ऐन गरजेच्या वेळी वीज जाण्याचे प्रकार का होतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याला ‘महावितरण’ची यंत्रणा काही प्रमाणात जबाबदार असल्याचा आरोप होतो आहे.
साहेब म्हणतात बघतो, करतो –
याबाबत महावितरण च्या श्रीवर्धन कार्यालयातील उपविभागिय अभियंता विजय बोरसे यांच्याशी संपर्क केला असता करू,बघू असे उत्तर दिले तर वाळवटी परिसरातील कनिष्ट अभियंता दिपक घुगे यांच्याशी संपर्क केला असता नॉट रीचीबल असल्याचे समजले.
कीत्येक दिवसांपासून महावितरणच्या त्रासाने हैराण आहोत. अधिकारी बेजबाबदारपणे उत्तर देतात. दुर्गम भाग असल्यामुळे या गावांकडे दुर्लक्ष केलं जाते.
-जयेश जाधव,
नागलोळी रहिवासी.