शशिकांत मोरे
धाटाव : महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. नव्या पिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर पराक्रमाची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना विशेषतः शिवभक्तांना गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती मिळावी आणि शिव विचारांचा गाढा अभ्यास व्हावा याच हेतूने सालाबाद प्रमाणे यावर्षीही रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे.
रोह्यात म्हाडा कॉलनी येथे आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाबरोबर उत्तेजनार्थ विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. मागील ७ वर्षापासून सुरू असलेल्या या स्पर्धा सध्या निवडणुकीच्या धामधुमीतही घेण्यात आल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शिवभक्तांना आपल्या कलागुणांना वाव मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये असंख्य इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी रोह्यात नितीन परब यांच्या कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख यांनी केले आहे.
याकरिता अरुण साळुंखे, नाना दळवी,सचिन दळवी, सुहास येरूणकर, विजय शिंदे, सूर्यकांत मोरे, संदीप सावंत, संतोष पार्टे, जीवन देशमुख, प्रशांत देशमुख, हर्षद साळवी, चेतन कामथे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.