माझे मत

ॲड. पंकज सुभाष पंडित
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महविकास आघाडीत एकही जागा न देता हातात भोपळा मिळाला आहे. पक्षाची हि परिस्थिती होण्यास जबाबदार कोण? असा सवाल सध्या रायगड जिल्ह्यातील सर्व सामान्य काँग्रेसचे कार्यकर्ते व मतदार एकमेकाला करतांना दिसत आहेत.
१९६२ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा खासदार, केंद्रीय मंत्री पद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद, विविध तालुक्यात आमदार, राज्यात कॅबिनेट मंत्री,राज्य मंत्री पद,महामंडळाचे अध्यक्ष पद तसेच रायगड जिल्ह्यात आजवर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फक्त काँग्रेस पक्षानेच स्वबळावर संपूर्ण सत्ता मिळवत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळवले आहे. आज ह्याच काँग्रेस पक्षाला ना लोकसभेचे तिकीट ना कोणत्याही तालुक्यात विधानसभेचे तिकीट मिळताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाची पाटी कोरी आणि हातात भोपळा अशी परिस्तिथी होताना दिसते. ह्याला जबाबदार कोण? वेळोवेळी करण्यात आलेल्या आघाड्या, त्यातून मित्र पक्षाला सोडलेल्या स्वतःच्या हक्काच्या व परंपरागत जागा? काँग्रेसच्या नेत्यांनी हक्काचे मतदार संघ तेव्हाच्या आणि आताच्या मित्रपक्षाला सोडल्या की आंदण का दिल्या हा हि मोठा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पक्षाला वाईट दिवस आल्याच्या नंतर पक्ष सोडून गेलेले दिग्गज नेते? पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून वेळोवेळी नेत्यांनी पक्षाच्या विरोधात केलेल्या बंडखोऱ्या? वर्षानुवर्ष आपला राजकीय शत्रू असणाऱ्या पक्षाबरोबर केलेली आघाडी, त्यातून दुरावलेले नेते आणि कार्यकर्ते? की स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्यांनी वेळोवेळी केलेल्या सीटसाठीच्या सेटलमेंटस्? असे अनेक सवाल आज काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्ते व मतदारांमध्ये आहेत.
गेल्या काही वर्षात काँग्रेसचे बरेच दिग्गज नेते दिवंगत झाले. त्यानंतर त्या त्या तालुक्यात त्या तोडीचे सक्षम नेतृत्व तयार झाले नाही, ह्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. आघाडीत राहून पक्षाला तिकीट मिळवुन देण्याची ताकद सध्याच्या नेत्यांमध्ये दिसून येत नाही. त्यात वरच्या पातळीवरच्या नेत्यांनी संपुर्ण कोकणात स्वपक्षावर काट मारून सर्वच्या सर्व जागा मित्र पक्षाला देऊन टाकल्या आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधदुर्ग या तीनही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे आजकाल काँग्रेसची निशाणी असलेला हाताचा पंजा मतदान यंत्रावर दिसत नसल्याने अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी खंत व्यक्त केली आहे. सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडे गप्पा, चर्चा आणि राजकीय विश्लेषण करण्या पलीकडे काम नसले तरी आजही रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे आणि ह्याच काँग्रेसच्या मतांवर अनेक मतदार संघाचे गणित अवलंबून असणार आहे. गेल्या काही निवडणुकीत कोणते बटण दाबले की कोण घरी बसतयं हे काँग्रेसच्या मतदारांना चांगलं कळलेलं आहे.