• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेना आणि धनुष्य बाण उद्धव ठाकरे यांच्याकडंच राहायला हवा होता; अमित ठाकरे यांचं मोठं विधान

ByEditor

Oct 31, 2024

मुंबई : ‘शिवसेना हा पक्ष फुटणं आणि आमदारांनी बंड करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र, शिवसेना आणि धनुष्य बाण याच्यावर एकनाथ शिंदे यांनी दावा करणं चुकीचं होतं, असं महत्त्वाचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी केलं आहे.

अमित ठाकरे हे विधानसभेच्या माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ठाकरे या नावामुळं त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून त्यांच्या मुलाखतींचा सपाटा सध्या सुरू आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेना फुटीबद्दल आपली बिनधास्त मतं मांडली. ‘शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांचा आहे आणि धनुष्य बाण हे चिन्हही त्यांचंच होतं. ते त्यांचंच राहिला हवं होतं. त्यांनी ते कमावलं होतं. लोकांच्या मतावर कमावलेलं चिन्ह होतं. हे दोन्ही उद्धव ठाकरे यांच्याकडंच राहिला हवं होतं. असं कुणाच्याही बाबतीत घडायला नको, असं अमित ठाकरे म्हणाले.

राज्यातील राजकारणाच्या खिचडीला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न अमित यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडं अप्रत्यक्षपणे बोट दाखवलं. २०१९ साली जे काही झालं, ती सुरुवात होती. महाविकास आघाडी ही घोडचूक होती. २०१४ साली युती तोडली, पुन्हा २०१९ ला एकत्र आले. २०१९ ला युती तोडून अशा लोकांबरोबर गेले, ज्यांच्याशी विचारच जुळत नाहीत. मतं नरेंद्र मोदी आणि बाळासाहेबांच्या नावावर मतं घेतली आणि दुसरीकडंच जाऊन बसले. ती मोठी चूक होती. तिथून राजकारणाचा चिखल होण्यास सुरुवात झाली, असं अमित ठाकरे म्हणाले.

भाजपसोबत जाण्याचा शिंदेंचा निर्णय योग्य होता!

शिवसेना फोडण्यात भाजपचा हात होता का या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी नकारात्मक उत्तर दिलं. ‘एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे ४० आमदार हे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे होते. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांसोबत काम करायला कसं वाटलं असेल याची कल्पना करणंही अवघड आहे. त्यासाठी अडीच वर्षे लागली असतील. तो मोठा निर्णय होता. त्यामुळं वेळ लागले असेल. त्यामुळं शिंदे आणि ४० आमदारांचा निर्णय चुकला असं वाटत नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.

मनसेच्या १०० जागा निवडून येतील!

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या १०० जागा निवडून येतील, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यातील आगामी सत्तेत आम्ही नक्कीच असू. लोक आम्हाला तिथपर्यंत नेतील, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!