अखिल आगरी समाज परिषदेची पत्राद्वारे मागणी
महेश बालदी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
विठ्ठल ममताबादे
उरण : सध्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या निडणुकीमध्ये अखिल आगरी समाज परिषद राजकारणापासून अलिप्त आहे. असे असताना उरण विधानसभेतील उमेदवार महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत मी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेच्या निवडणूकीला उभा नसून, विधान परिषदेच्या निवडणूकीला उभा आहे, असे वक्तव्य करून आगरी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचे वक्तव्य निषेधार्ह असून आगरी समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी असे आवाहन अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ का. पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, सरचिटणीस दिपक म्हात्रे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
अखिल आगरी समाज परिषद ही संस्था आगरी समाजाची शिखर संस्था आहे. महेश बालदी यांनी एका सभेत भाषणा दरम्यान अखिल आगरी समाज परिषदेचा उल्लेख करून अपमान केल्याचा आरोप अखिल आगरी समाज परिषदेने केला असून त्याबाबत महेश बालदी यांनी जाहीर माफी मागावी याबाबत महेश बालदी यांना अखिल आगरी समाज परिषदने पत्र सुद्धा पाठविले आहे. याबाबत महेश बालदी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अखिल आगरी समाज परिषद ही राजकारण विरहित सामाजिक काम गेले अनेक वर्ष करीत आहे. या परिषदेसाठी कॉ. जी. एल. पाटील, ग. ल. पाटील, वाजेकर शेठ, सोनूभाऊ बसवंत, ॲड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, व दि. बा. पाटील यांनी फार मोठे योगदान दिले आहे. दि. बा. पाटील यांनी १९८८ ते २०१३ पर्यंत या परिषदेचे समर्थ नेतृत्व केले आहे. त्यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी अखिल आगरी समाज परिषदेच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पूणे आदि जिल्हयातील प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांनी सर्वपक्षीय लढा दिला. त्यामुळे या लढ्याची दखल घेवून राज्यसरकारने या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुर केला व तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. लवकरच या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात येईल. असे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री श्री. नायडू यांनी सर्व पक्षीय कृती समितीला दिले आहे. असे असतांना महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत अदानी विमानतळाशी चर्चा केली असल्याचे सांगितले. हे ही त्यांचे वक्तव्य चुकीचे व दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध करणारे असल्याची समज आगरी समाजात पसरली आहे.
महेश बालदी यांच्या या वक्तव्यामुळे भूमीपुत्रांच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे. वरील दोन्ही वक्तव्यासंबंधी महेश बालदी यांनी जाहीर माफी मागावी असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे. अशी माहिती अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ का. पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, सरचिटणीस दिपक म्हात्रे यांनी दिली आहे. अखिल आगरी समाज परिषद व लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती या संस्थेचे हित लक्षात घेवून हे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्राचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसून केवळ समाजाची बांधिलकी यामागे आहे हे जाणावे.असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महेश बालदी यांनी आगरी समाजाचा एका भाषणात अपमान केला आहे. तसेच अदानी विमानतळ असा देखील त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आहे. त्यांची दोन्ही व्यक्तव्ये चुकीची आहेत. आगरी समाजाचा अपमान करणारी आहेत. म्हणून अखिल आगरी समाज परिषदतर्फे त्यांना पत्र लिहून त्यांनी आगरी समाजाची जाहिर माफी मागावी असे त्यांना कळविले आहे. महेश बालदी यांना यासंदर्भात व्हाट्सअपवर पत्र सुद्धा पाठविण्यात आले आहे. परंतु या घटनेवर महेश बालदी यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. जर महेश बालदी यांनी जाहिर माफी मागितली नाही तर ८ दिवसांनी परिषदेची बैठक बोलावून पुढची दिशा व भूमिका ठरविण्यात येईल. अखिल आगरी समाज परिषदेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. असे असले तरी मुद्दामून आगरी समाजाला राजकारणात खेचले जात आहे. समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही
-दशरथ का. पाटील
अध्यक्ष, अखिल आगरी समाज परिषद.