मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना कल्याणमध्ये एका व्हॅनमधून पाच कोटींपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिळफाटा येथे निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाला एका वाहनात पाच कोटी ५५ लाखांची रोकड सापडली. ही रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभाग आणि निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, अशी माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी माध्यमांना दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. यादरम्यान कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत मोठी रक्कम जप्त केली आहेत. आता कल्याण येथील शिळफाटा परिसरात स्थिर सर्वेक्षण विभागाच्या एका पथकाने शनिवारी सकाळी एका संशयास्पद वाहनांची तपासणी केली, ज्यात त्यांना मोठ्या प्रमाणात रोकड आढळली. ही रक्कम ५ कोटी ५५ लाख इतकी होती. यासंबंधित वाहनचालकाकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नव्हते.यामुळे निवडणूक पथकाने ही रक्कम जप्त केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून प्रचाराला वेग आला आहे. राज्यात आचारसहिंता लागू करण्यात आली असून या निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने सोबत पैसे ठेवण्याची मर्यादा निश्चित केली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीला स्वत: जवळ ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम ठेवता येणार नाही. असे असल्यास कागदपत्रे दाखवावी लागतील. हे नियम उमेदवारांसह सर्व सामान्य लोकांसाठी देखील आहेत. कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त केली जाते.