रायगड : हवामान विभागातर्फे पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या शनिवार, २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पूर परिस्थीती निर्माण होऊन धोकाही उद्भवला होता. हवामान विभागातर्फे पुढील ४८ तास हे रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दि. २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.