घन:श्याम कडू
उरण : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळविले आहे. त्यामध्ये भाजपाने तब्बल १३५ हून अधिक जागा जिंकल्यामुळे भाजपा नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता तसेच रायगडमधून एकनाथ शिंदे शिवसेनेचे भरत गोगावले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोल्समधून जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्या चुकीच्या ठरवत महायुतीने तब्बल २८८ पैकी २३६ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३३, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार) १० जागा जिंकल्या आहेत.
राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंतच आहे. तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे महायुती २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात.
राज्यात उद्या नवीन सरकार भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री निवड होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नवीन सरकारमध्ये रायगड जिल्ह्यातून गेली दोन तीन वर्षे मंत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे महाड विधानसभा मतदारसंघातील आमदार भरत गोगावले व राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन मधील आमदार आदिती तटकरे यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज सायंकाळी तातडीने नवनिर्वाचित आमदार व नेतेमंडळी यांची बैठक होऊन त्यामध्ये मुख्यमंत्री व इतर मंत्रिमंडळ यावर चर्चा होऊन उद्या मुंबईतील वानखेडे मैदानावर शपथविधी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.