पुणे : विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर गंभीर आरोप करत बाबा आढाव यांचं तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर तीन दिवस सुरू असलेले आत्मक्लेश आंदोलन मागे घेतले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील त्यांनी केली होती. यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, सुषमा अंधारे हे देखील उपस्थित होते.
ईव्हीएमवर विरोधात बाबा आढाव यांचे मागील तीन दिवसांपासून पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आज शरद पवार, अजित पवार यांनी आंदोलनाला भेट दिली. तर आता उद्धव ठाकरेंनी आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. आढावांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जिंकलेले आणि हरलेले देखील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाला भेटी देत आहे. कारण, निकालावर जिंकलेल्यांचा विश्वास नाही आणि हरलेल्यांचा आपण हरलो तरी कसे, यावरही विश्वास नाही, असं ठाकरे म्हणाले.
आज सकाळी शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये आणि देशात पैशांचा वापर करून विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे. जे लोक संसद अन् संसदेच्या बाहेर भेटले त्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झालीय. पाच लोकांमध्ये चर्चेचा सूर असून बाबा आढाव यांनी पुढाकार घेवून त्यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरु केलंय. बाबा आढाव यांनी एकट्याने ही भूमिका घेणं योग्य नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. लोकांनी देखील उठाव केला पाहिजे, अन्यथा लोकशाही धोक्यात येईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सतत बदलत गेली आहे. ईव्हीएम आणि पैशांच्या वापरामुळे असा निकाल आलाय. तीन दिवस आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचं बाबा आढाव यांनी सांगितलं आहे. त्यानंतर ते सरकार विरोधात सत्याग्रह देखील करणार आहेत. अदाणींविरोधात लोकसभेमध्ये बोलू दिलं जात नाही. मी इथे आत्मक्लेश आंदोलन करतोय. तसंच बाबा आढाव यांनी गौतम अदानींवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलीय. आज बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला विरोधक नकोच आहेत, असं वक्तव्य केलंय.