नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र असल्याचे म्हटले आहे. नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकजण दु:खी आहे. प्रत्येकाला ते सध्या ज्या पदावर आहेत, त्यापेक्षा मोठे पद हवे आहे.
या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र आहे, जिथे प्रत्येकजण दु:खी आहे. नगरसेवक आमदारकीची संधी न मिळाल्याने दु:खी असतो. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार नाराज असतो. एखादा मंत्री मुख्यमंत्री होऊ शकला नाही म्हणून दुखी असतो तर, मुख्यमंत्र्याला हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते.”
या कार्यक्रमात पुढे बोलताना गडकरी म्हणाले, “जीवनात अनेक आव्हाने असतात. या आव्हानांचा सामना करत पुढे जाणे हीच जीवन जगण्याची कला आहे.” या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक गोष्ट सांगितली. निक्सन यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, “माणूस पराभूत होतो तेव्हा संपत नाही, तो जेव्हा थांबतो तेव्हा संपतो.”