मुंबई : मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 100 हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.
जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या विसाव्या वर्षी 1954 पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या73व्या वर्षांपर्यंत त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरूच राहिली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) सारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केलं. 100 हून अधिक नाटकात काम करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे.