किरण लाड
नागोठणे : येथील अंबा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूर भागातील वीजपुरवठा दि. २१ जुलै रोजी खंडित करण्यात आला होता. पुन्हा दि. २२ जुलै रोजी मध्यरात्री कानसई सबस्टेशन समोरच्या जंगलातील मुख्य विद्युत वाहिनीवर झाड पडुन विद्युत तारांचे व पोलांचे नुकसान होऊन नागोठणे तसेच विभागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरु होतो ना कहोतो तोच दि. २४ जुलै रोजी मध्यरात्री पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. साधारणतः सात तासांनी सकाळी ७ वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाला. लाईट नसल्याने नागरिक प्रचंड वैतागले होते. वेळीच महावितरणने दाखविलेल्या तत्परतेने नागोठणे तसेच विभागातील वीजपुरवठा सुरळीत झाला असुन नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्यात तसेच रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अशातच तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले होते. अनेक भागात दरडी कोसळण्याच्या घटना समोर आल्या होत्या. जीवितहानी तसेच वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली होती. मुसळधार पावसाने अंबा नदीला दि. २१ जुलैला पूर येऊन पाणी नागोठणे शहरात घुसले होते. खबरदारी म्हणून महावितरणने काही भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. अशातच धो धो पाऊस आणि वारा यामुळे कानसई सबस्टेशन समोरील मुख्य विद्युत वाहिनीवर दि. २२ जुलै रोजी मध्यरात्री झाड पडले त्यात तारांसकट पोलाचे नुकसान झाले होते. तरीही अशा नैसर्गिक संकटावेळी महावितरणने दुसरा पर्याय म्हणून एमआयडीसी भागातून नागोठणे तसेच विभागाचा वीजपुरवठा सुरळीत केला होता. कानसई भागातील वीज तारांवर पडलेले झाड तोडणे, पडलेले पोल उभे करणे, वीजेच्या तारा सुरळीत करणे ही कामे महावितरणचे कर्मचारी, तसेच ठेकेदाराची माणसे रविवार, दि. २३ जुलैपर्यंत करीत होती.
पुन्हा दि. २३ जुलैच्या मध्यरात्रीला म्हणजेच अचानक ज्या एमआयडीसी फिडरवरुन नागोठणे तसेच विभागाला लाईट दिली होती, तेथील ब्रेकर प्राॅब्लेम झाला आणि सुरळीत बत्ती गुल झाली होती. रात्रभर नागोठणे शहरासह विभाग अंधारात बुडला होता. नागरिक लाईटविना वैतागलेले होते. परंतु, अशावेळी महावितरणाचे सहाय्यक कनिष्ठ अभियंता नितीन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन शंकर पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ नरेंद्र सकपाळे, सिध्देश मळेकर, सुधीर शिर्के, सचिन हरपाल, कल्पेश दपके, दिलीप हंबीर, आदित्य भोईर, तानाजी वारगुडे, काजल आगलावे, श्रीवेद जाधव तसेच महावितरण ठेकेदाराचे कामगार या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन दि. २२ व २३ जुलै रोजी १२ तास तसेच २३ व २४ जुलै रोजी ७ तासात नागोठणे व विभागातील खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांनी सुटेकाचा नि:श्वास सोडून समाधान व्यक्त केले.