२४० रुपये प्रति किलो दराने होतय विक्री
सलीम शेख
माणगाव : मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने रानात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवल्या आहेत. अत्यंत चविष्ट व पौष्टिक असलेल्या या भाज्यांना चांगली मागणी आहे. या दिवसांत बाजारपेठेत रानभाज्यांचा सुकाळ आहे. या भाज्यांमध्ये अत्यंत चविष्ट व पौष्टिक असलेली रानभाजी म्हणजे करटोली (कंटोळी). यावर्षी पाऊस लांबल्याने खवय्यांना या भाजीची प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने रानात करटोलीची भाजी मोठया प्रमाणात मिळू लागली आहे.
यावर्षी ही भाजी काहीशी महाग असून गेल्या वर्षी २०० रुपयांना किलो असणारी भाजी यावर्षी २४० रूपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. सुरुवातीच्या काळात ही भाजी महाग असली तरी पुढील काळात या भाजीचे दर खाली येतील असे विक्रेत्यांनी सांगितले.
लांबलेल्या पावसाने करटोली भाजी उगवण्यास उशिर झाला. मात्र दमदार पावसाने गेल्या काही दिवसांपासून हि भाजी रानात मिळत असून यातून रोजगार मिळत आहे. करटोली २४० रूपये किलो आहेत. बाकी भाज्या दहा रुपयांना जुडी विकली जाते आहे.
लक्ष्मी जाधव,
भाजी विक्रेत्या