मुंबईः ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे १३ जणांच्या मृत्यूला कारभूत ठरल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नौदल, तटरक्षक दल व मुंबई पोलिसांनी राबवलेल्या बचाव कार्यात ११५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अद्याप दोघे बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका स्पीड बोटीने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोट कलंडली आणि बुडू लागली. अपघातात वाचलेले नाथाराम चौधरी (२२) यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१)), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३) (५) अंतर्गत गुन्हा नोंदविला.
दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचारी असे एकूण ११५ जणांना बचाव कार्यात वाचवण्यात आले. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ९७ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात ७५, नेव्हल डॉकयार्डमध्ये २५, अश्विनी रुग्णालयात एक, सेंट जॉर्जमध्ये नऊ, करंजे येथे १२, तर मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले आहे.
नीलकमल बोटीवरील पाच कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. अपघाताची चित्रफीतही समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंजिन उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींचा मृत्यू
या बोटीमध्ये उत्पादक कंपनीचे चार प्रतिनिधी आणि नौदलाचे दोन अधिकारी होते. चाचणीवेळी झालेल्या अपघातात नौदल अधिकारी महेंद्र सिंग शेखावत व उत्पादक कंपनीचे दोन प्रतिनिधी प्रवीण शर्मा व मंगेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून इतर दोघांवर किरकोळ उपचार चालू आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.
“ही दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नौदलाची स्पीडबोट प्रवासी बोटीला धडक देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. नाथाराम चौधरी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला होता. तेच या प्रकरणातील तक्रारदार आहेत”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.