लोकप्रतिनिधींनी पनवेल ते इंदापूर प्रवास एसटीने करावा; प्रवासीवर्गाची संतप्त प्रतिक्रिया
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पनवेल ते इंदापूर दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था पाहता या महामार्गावर रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ता अशी या महामार्गाची अवस्था झाली असुन रस्ताच हरवला असल्याची जीवघेणी परिस्थिती या महामार्गाची झाली आहे. यावर संतप्त प्रवाशांची प्रतिक्रिया घेतली असता लोकप्रतिनिधींनी पनवेल ते इंदापूर प्रवास एसटी बसच्या मागील सीटवर बसुन करावा म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रवासादरम्यानच्या यातना त्यांना कळतील अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता चौपदरीकरणासाठी पत्रकार व विविध संस्थांकडून रास्तारोको करण्यात आले होते. शेवटी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यान पहिल्या टप्प्याचे काम २०१० पासून सुरुही झाले परंतु या महामार्गाच्या कामाला १३ वर्षे पुर्ण झाली असुन किती ठेकेदार आले आणि गेले तरीही या कामात कोणतीही प्रगती नाही. या महामार्गांवरील कोलाड ते नागोठणे दरम्यानची अवस्था पाहता रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ता अशीच झाली असुन कोणत्याही वाहनातून प्रवास करतांना जणू काही होडीतून प्रवास केल्यासारखे वाटत आहे. अनेक वाहने खड्डयातून जातांना पंक्चरही होत आहेत. यामुळे प्रवाशांना तासनंतास रस्त्यावर उभे रहावे लागत आहे.

खांब नजिक रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पाण्यात असणाऱ्या खड्डयाचा अंदाज न आल्याने स्कुटीवरून जाणारा निलेश महाडीक हा खड्डयात पडून जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या महामार्गांवरील खड्डयांमुळे नाहक बळी जात आहेत तर काहीजण गंभीर जखमी होत आहेत. रस्त्याच्या अवस्थेमुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे.
अकोला ते अमरावती ७५ किलोमीटरचा रस्ता एका वर्षात नाही, एका महिन्यात नाही चक्क पाच दिवसात पूर्ण होऊन त्याची नोंद गिनीज बुकात होते. परंतु मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाला १३ वर्षे होऊन पूर्ण होऊनही रस्ता पूर्ण होत नाही. लोकप्रतिनिधी केवळ तारीख पे तारीख देत आहेत मात्र कामात कोणतीही प्रगती नाही. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी प्रशासनाला आणि ठेकेदारांना शिव्यांची लाखोली वाहताना दिसत आहे.