किरण लाड
नागोठणे : भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला बुधवार, दि. २६ जुलैला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्यांना पूर देखील आला होता. ठिकठिकाणी दरडी कोसळून जीवित तसेच वित्तहानी झाली होती. बससेवा, वाहतुक व्यवस्था कोलमडून जनजीवन विस्कळीत झाले होते. दि. २६ जूलै रोजी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गावातुन, वाड्यांतुन, डोंगरातुन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक वर्गांचे हाल होऊ नये, त्यांना येणाऱ्या नैसर्गिक सकंटाची आगाऊ सुचना मिळण्यासाठी,तसेच संभाव्य पुढील धोक्यापासून सावध राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय संदेश शिर्के निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी आपत्ती व्यवस्थापन, रायगड यांनी शासन निर्देशानुसार घेतला आहे.