अमुलकुमार जैन
रायगड : जिल्ह्यतील मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पीसोली येथील तेरा जणांचा ग्रुप पर्यटनासाठी आला होता. यामधील मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख (वय 55 वर्षे, मूळ राहणार, आंबले, तालुका – शिरूर, जि. पुणे, सध्या राहणार महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, पिसोली, तालुका हवेली, पुणे) यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना ही आज दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हवेली तालुक्यातील पिसोली येथून धर्मेंद्र देशमुख हे त्यांचे सहकारी रवी जनार्दन फुले, विशाल अशोक पाटील, रणजित काशीराम ननावरे, आकाश परशुराम सोनवणे, प्रकाश संजय वाघमारे, सोनाली सागर फाले, शुभांगी रामचंद्र माने, वैशाली रामचंद्र ननावरे, मनीषा संदीप शिंदे यांच्यासहित इतर सहकारी शिक्षक आणि एक इतर असा तेरा जणांचा समूह हा आज पहाटे चार वाजता एका खासगी ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. सकाळी अकराच्या सुमारास सर्व जण काशीद समुद्र किनारी आले होते. मात्र त्यांना काशीद समुद्राचे पाणी बघून पोहण्याचा मोह आवरता आला नाही. धर्मेंद्र देशमुख आणि त्यांचे सहकारी हे समुद्र स्नान करण्यासाठी समुद्रात गेले. मात्र धर्मेंद्र देशमुख यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. धर्मेंद्र देशमुख हे बुडत असल्याचे काशीद समुद्र किनारी असणारे जीव रक्षक दलाचे सदस्य यांनी पाहिले असता त्यांना पाण्यातून बाहेर काढून स्पीड बोटीद्वारे समुद्र किनारी आणले.
तदनंतर धर्मेंद्र देशमुख हे बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात धर्मेंद्र देशमुख यांना वैद्यकीय अधिकारी सुरक्षा म्हात्रे यांनी तपासून दुपारी दोन वाजून ५५ मिनिटाच्या सुमारास मृत घोषित केले.
मोठ्या संख्येने पर्यटक काशीद समुद्र किनारी येत असून पोहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पर्यटनासाठी आलेल्या शिक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेचा अधिक तपास मुरुड पोलीस करीत आहेत.
काशीद समुद्रकिनारा ठरतोय जीवघेणा
जगाच्या नकाशावर रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनाऱ्याची नोंद आहे. त्यामुळे तो पर्यटकांच्या पसंतीला उतरत आला आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबई, पुणे औरंगाबादसह वेगवेगळ्या राज्यांतील, देश-विदेशांतील पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. किनाऱ्यावरील टेहळणी टॉवर जीर्ण झाले आहेत. किनारी पर्यटकांना सतर्क ठेवण्यासाठी सायरनचा अभाव आहे. तसेच अपुऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे किनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येतात. परंतु प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्याचा फटका पर्यटकांना बसत आहे. दरवर्षी समुद्रकिनारी पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असतानाही याची प्रशासन गांभीर्याने दखल का घेत नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.