माणगाव आणि इंदापूर बायपास फेब्रुवारीत सुरू होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका
मेमू सेवा आणि माणगावला रेल्वेचे थांबे मिळणार
सलीम शेख
माणगाव : गेली १७ वर्षे रखडलेला, अपघातात हजारो जणांचे बळी घेणारा, मृत्यूचा सापळा बनलेला, वाहतुकीच्या कोंडीत अडकलेला, अनेकांचा कर्दनकाळ ठरलेला, असंख्य प्रवाशांची कुटुंब उध्वस्त करणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्गाचे काम माझी सर्व राजकीय ताकद वापरून येत्या नवीन वर्षातच पुर्ण करणार तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येईल. दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा आणि माणगाव रेल्वे स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबे मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून माणगाव आणि इंदापूर येथील प्रवाशांची वाहतूकीच्या कोंडीतून लवकरच सुटका केली जाईल असे अभिवचन रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथे मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्याने उपस्थित समस्त माणगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने कोकणातील सागरी मार्ग आणि ग्रीन फिल्ड एक्सप्रेस महामार्ग सुरू करण्याचे ध्येय ठेवले असून लवकरच या दोन्ही महामार्गाचे सुरू होईल. कोकणातील पर्यटन, रोजगार, उद्योग, शेती, बागायती, फळफळावळ यांना चालना देण्यासाठी हे मार्ग भविष्यात कोकणात नवीन क्रांती घडवून आणणारे आहेत. भविष्यात मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण येवू नये आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हे दोन महामार्ग अत्यंत आवश्यक आहेत. हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा महामार्ग तातडीने पूर्ण केला जाईल असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी खरवली जोड रस्ता ते मोरबा अशी वाहतूक मुंबई कडून श्रीवर्धन कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी करण्यात येईल. तसेच मोरबा रोड कालवा मार्ग ते मुंबई गोवा महामार्ग अशी वाहतूक माणगाव शहरात न वळवता सुरू करण्यात येईल. तसेच पुणे येथून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी लवकरच भादाव येथील काळ नदीवरील पूल बांधण्यात येईल. तसेच माणगाव शहरातील वाहतुकीची कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी काळ नदी आणि गोद नदीवरील पूलांची कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील. जे ठेकेदार हे काम वेळेत पूर्ण करणार नाहीत त्यांना शासनाच्या काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा असे स्पष्ट आदेश खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले.
माणगाव शहरातील पोलिस ठाणे त्यांची निवासस्थाने, सैनिक विश्राम गृह, जिल्हा परिषद शाळा नगरपंचायतीमध्ये हस्तांतरीत करणे, तालुक्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजना, रस्ते, एसटी बस, कालवा दुरुस्ती, नाट्यगृह, प्रदुषण विरहीत कारखाने, शिवसृष्टी, रोजगार आदी विविध प्रकारच्या मागण्यांवर उपाययोजना करण्याचे आणि त्या मंजूर करण्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली, मुंबई येथे बैठका घेतल्या जातील. यासाठी ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. शेवटी स्थानिक वृत्तपत्रांनी माणगाव शहरातील वाहतुकीच्या कोंडीबाबत जनजागृती केली त्याबद्दल आभार व्यक्त केले.