उरण परिसरात कंपनी व अनधिकृत कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. त्यामुळे चोरट्यांनी धुमाकूळ मांडला आहे. तर काही ठिकाणी कंटेनर फोडून त्यामधील मौल्यवान माल लंपास करणार्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये चढाओढ सुरू असल्याने आपापसात वैर वाढत चालले आहे. यामुळे भविष्यात त्याचे दुष्परिणाम ही एकमेकांचे जीव घेण्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गैर धंद्याची माहिती शासकीय यंत्रणेला असतानाही ते आर्थिक हितसबंधामुळे कारवाई करीत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. |
घनःश्याम कडू
उरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. त्यामुळे नवनवीन प्रकल्प येऊ लागल्याने इतर व्यवसायातही दिवसेंदिवस वाढ होताना चालली दिसत आहे. या व्यवसायात आपलीच मक्तेदारी राहावी यासाठी स्थानिकांमध्येच चढाओढ सुरू झाली आहे. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊ लागले आहे. काही वर्षांपूर्वी अशाच वादातून संतोष ठाकूर या तरुणाची हत्या झाली होती. त्यामुळे भविष्यात उरणमध्ये पुन्हा गँगस्टरचा फडका उडण्याची शक्यता दिसू लागली आहे.
उरणमधील जेएनपीटी कंपनीतील स्लज ऑईलच्या व्यवसाय मिळविण्यासाठी 10 ते 12 वर्षांपूर्वी दोन गटात चढाओढ सुरू होती. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन उरणमधील संतोष ठाकूर या तरुणांची सायंकाळच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतरही उरणमध्ये छोट्यामोठ्या हाणामारीच्या घटना घडताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर व्यवसायाच्या वादातून हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्याबाबत पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याने आपण न्यायालयात दाद मागून हल्ला करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप सरपंच कुणाल पाटील यांनी केला होता. परंतु सदर वादाचे कारण हे उघड झाले नसले तरी व्यवसाय मिळविण्यावरून वाद झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने अनेक छोटेमोठे उद्योग वाढू लागले आहेत. सदरचे व्यवसाय आपल्यालाच मिळावे यासाठी स्थानिकांतच चढाओढ लागली आहे. तर काही ठिकाणी आपला व्यवसाय दुसर्या पार्टीकडे गेल्याने दोन गटात वैर वाढत जाऊन एकमेकांवर हल्ला करण्यापर्यंत मजल जाते. असाच हल्ला पागोटे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर झाला असल्याची चर्चा आहे. भविष्यात याला आळा घातला नाहीतर ज्याप्रमाणे संतोष ठाकूर याची काही वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.