जेएनपीटी जनरल कामगार संघटनेची जेएनपीए प्रशासनाकडे मागणी
विठ्ठल ममताबादे
उरण : दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रात्री २२.३० वाजता इर्षाळवाडी येथे दरड कोसळून संपुर्ण गाव दरडीखाली दबले गेले. त्यात एकूण ४३ कुंटुंबातील अंदाजे २२८ लोकांपैकी २७ लोकांचे मृतदेह सापडले तर ५७ लोक बेपत्ता आहेत. तसेच १४१ लोक जिवंत सापडले आहेत. त्यांना तात्पुरत्या स्वरुपात चौक येथे कंटेनरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे जेएनपीए प्रशासनाने सीएसआर फंडातून इर्शाळवाडी येथील अंदाजे १४१ लोकांचे तातडीने कायम स्वरुपी पुनर्वसन करावे अशी मागणी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा यांनी जवाहलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) कडे पत्रव्यवहाराद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून केली आहे.

यावेळी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत यांनीही इर्शाळवाडीची दुर्घटना किती भयानक आहे तसेच त्या दुर्घटनाग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन करणे किती महत्वाचे हे जेएनपीएचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांना पटवून दिले. जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, सेक्रेटरी जनार्दन बंडा यांची बाजू ऐकून घेऊन डेप्युटी चेअरमेन उन्मेष वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी लवकरच योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.