• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी राजेश सुर्वे यांचे निवड

ByEditor

Jul 27, 2023

सलीम शेख
माणगाव :
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व प्रमुख संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. या संघटनेची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून राज्य संघटनेच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारणीत अध्यक्ष – केशवराव जाधव, सरचिटणीस – राजेश सुर्वे, राज्य कार्याध्यक्ष – देविदास बसवदे, आबासाहेब जगताप, गोविंद उगले, कोषाध्यक्ष – साजिद अहमद, प्रमुख संघटक – प्रसाद पाटील, चिंतामणी वेखंडे, कार्यालयीन मंत्री- यादव पवार, उपाध्यक्ष – नवनाथ गेंड, अनिल पलांडे, सतीश कांबळे, सह सचिव अंजुम पठाण, प्रसिद्धीप्रमुख प्रविण पाताडे यांची निवड करण्यात आली आहे

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर अनेक शिक्षक संघटना आपापल्या पातळीवर लढा देत आहेत मात्र सर्व शिक्षक वेगवेगळ्या संघटनांमध्ये विखुरलेले असल्याने शासन त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख सोळा शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्ष आणि सरचिटणीसांची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या सर्व संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. समान किमान मुद्द्यावर एकत्रित लढा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये शिक्षक संघ( शिवाजीराव गट), शिक्षक संघ (संभाजीराव गट), शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, पुरोगामी शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना, जुनी पेन्शन संघटना,उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक समिती, शिक्षक भारती प्राथमिक शिक्षक सेना आदी सोळा संघटनाचा समावेश आहे तसेच अन्य संघटनेने देखील या संघटनेच्या निर्णयास आणि नवीन कार्यकारणीस पाठिंबा दर्शविला आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीवर तीन महिन्यात निर्णय न झाल्याने तालुकास्तरापासुन ते राज्यपातळीपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिक्षकांना मुख्यालय राहण्याची अट रद्द करा, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरा, बदली धोरणात आवश्यक सुधारणा करा, शिक्षकाचे वेतन दरमहा एक तारखेला व्हायलाच पाहिजे या मागण्या सरकारकडे लावून धरण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!