मुंबई : मुंबई हायकोर्टात आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसलाय. शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली होती.
या प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. या सुनावणीला स्वत: याचिकाकर्ते हजर होते. याचिकेच्या या निकालाचं वाचन आज न्यायमूर्ती बोरकर आणि न्यायमूर्ती उपाध्याय यांनी केलंय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन मोठा वाद पेटला होता. आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं महायुती सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे शहराध्यक्ष अन् याचिकाकर्ते सुनील मोदी यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मोदी म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आम्हाला आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. आम्ही कायदेशीर लढाई लढणारच आहोत, असं ते म्हणाले आहेत. आजच मुंबई हायकोर्टाचा निर्णय महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय.
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 6 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्याकडे बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र अडीच वर्षानंतर सत्ता बदल झाला. त्यानंतर शिंदे सरकारने नव्या आमदारांची यादी पाठवली. मात्र ही यादी बेकायदेशीर आहे, असा आरोप महाविकास आघाडीने केला होता. दिलेल्या यादीनुसार 12 आमदार नियुक्त करावे. ही यादी मागे घ्यायची असल्यास त्याचं कारण द्यावं, अशी मागणी या याचिकेतून शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी केली होती. या प्रकरणी घटनेनुसार कायदेशीर कारवाई व्हावी. संविधानाचे कायदे पायदळी तुडवून राजकीय भवितव्य घडवताना दिसतंय. पुढील लढाई सुरू ठेवणार आहोत. या लढाईसाठी खुले असणारे मार्ग वापरणार आहोत, असं देखील सुनील मोदी म्हणाले आहेत.