मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महापौर बंगल्याच्या जागी उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामाविषयी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जुन्या महापौर बंगल्यात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आम्ही या ऐतिहासिक बंगल्याला हात न लावता स्मारक बांधणार आहोत. स्मारकाचं काम करणं जिकरीचं होतं पण 23 जानेवारी आधी स्मारक पूर्ण होईल. अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. चार भिंती म्हणजे स्मारक नाही. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट म्हणजे हे स्मारक आहे. त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी हीच अपेक्षा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला दिले तेच काम या स्मारकाने दिले पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र कधी लिहिले नाही. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारले जात होते आणि यावर ते म्हणत होते, मी कपाटातील माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचे आयुष्य उघडे पुस्तक होते. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष असून आम्ही पुढच्या वर्षी हे स्मारक शिवसेनाप्रमुखांवर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच आता पहिल्या टप्पाचे काम पूर्ण झाले यामध्ये अनेक अडचणी होत्या मात्र काम पूर्ण झाले असून आता टप्पा दोनचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.