घन:श्याम कडू
उरण : गेली ५ ते ६ दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे दुर्घटना घडण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी द्रोणागिरी गडावरील दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी प्रशासनाने घटनास्थळी जाऊन गडाच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना व इमारतीमधील लोकांना घरे खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याचे समजते. परंतु रहिवाशी हलण्यास राजी नसल्याचे दिसते.यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तालुक्यातील दरडग्रस्त वाड्यांचे सर्व्हे करून धोकादायक रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी इर्शालवाडीवर दरड कोसळून १०० च्या आसपास रहिवाशांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान द्रोणागिरी गडावरील दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी भविष्यात धोक्याची घंटा देणारी ठरणार असल्याचे भूगर्भतज्ञ सांगतात. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेली अनेक वर्षांपासून ऐतिहासिक असलेल्या द्रोणागिरी गडाला चारही बाजूने पोखरून मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व बिल्डरांनी मोठमोठ्या बेकायदेशीर इमारती उभ्या केल्या आहेत. यातील बहुतांश बांधकामे ही गडाच्या अगदी लागूनच आहेत. गेली अनेक वर्षांपासून सामाजिक संघटना, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते याबाबत मोर्चे, निदर्शने, आंदोलन करूनही स्थानिक व जिल्हा शासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले. तसेच येथील राजकीय पक्ष व त्यांचे नेतेमंडळी यांनीही लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर ओएनजीसी कंपनी असूनही त्यांच्या प्रशासनानेही दुर्लक्ष केले. याचाच फायदा माती चोरांनी उचलत गड पोखरण्यात यशस्वी झाले.
गेली ५ ते ६ दिवसांपासून पावसाने थैमान जगातले आहे. त्यात इर्शालवाडी सारखी दुर्दैवी दुर्घटना घडली. तरीही पाऊस सुरूच आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक द्रोणागिरी गडाला भगदाड पडत दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यापूर्वीही अशीच घटना घडली होती. दोन्ही घटनेच्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नसली आहे. मात्र भविष्यात द्रोणागिरी गडावर कधीही भयानक दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवित प्रशासनाने येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. परंतु प्रशासनाच्या हाकेला हो करण्यास रहिवासी तयार नसल्याचे दिसते.
प्रशासकीय यंत्रणेने उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केलेल्या मागणीनुसार वस्त्यांवरील वाड्यांमधील धोकादायक वस्तीन्ना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, अन्यथा भयानक दुर्घटना घडण्याची शक्यता भूगर्भतज्ञांनी व्यक्त केली आहे. शासकीय यंत्रणा कोणत्या प्रकारे कार्यवाही करते याकडे लक्ष लागून राहिले आहे.