कर्जतमधील विजेची समस्या त्वरीत सोडविणेबाबत निवेदन
गणेश पवार
कर्जत : तालुक्यात सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता या समस्यांवर वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका आक्रमक झाली आहे. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालून याबाबत जाब विचारलं आहे. तर उपअभियंता यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, महावितरणकडून या समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडी कर्जत शाखेच्यावतीने निवेदन देण्यात आले. कर्जत तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेच्या समस्यांबाबत नागरिक आपल्या कार्यालयात येवुन तक्रारी मांडत आहेत. तसेच सोशल मिडीयावर सातत्याने चर्चा होत आहे. परंतु महावितरणकडून विजेच्या समस्या कमी होणेऐवजी वाढतचं चालल्या आहेत. गेल्या वर्षी सुद्धा सुचना देवुन वेळेवर विजे संदर्भात कामे करण्याचे निवेदन दिले होते. परंतु त्यावेळेस सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अनेक वेळा दोन-तीन दिवस लाईट जायाची त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, घरुन ऑनलाईन काम करणारे, तसेच अनेकांचे व्यवसाय सुद्धा बुडाले.
आज दिनांक २३ मे रोजी निवेदनामार्फत महावितरणचे उपअभियंता यांना मागणी करण्यात आली की, आपण त्वरीत जून महिन्याचा पाऊस सुरु होणे अगोदर सर्व जुने पोल, वायरी बदलाव्यात तसेच जिथे जिथे झाडांच्या फांद्या वायर वर आहेत त्या तोडाव्यात. जेणेकरून लाईटचा खेळखंडोबा होणार नाही. वेळी-अवेळी लाईट घालवु नका, त्याच्या सुचना दोन दिवस अगोदर द्या जेणेकरून नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांना तसे नियोजन करता येईल.अशा मागण्यावर चर्चा करण्यात आली. त्यावर उपअभियंता प्रकाश देवके तसेच कनिष्ठ अभियंता साबळे यांनी त्वरीत सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान त्वरीत आमच्या मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थीतीस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल. सदर निवेदन देताना कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, तालुका महासचिव प्रदिप ढोले, अशोक कदम, तालुका कोषध्यक्ष राजू ढोले, कमलाकर जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.