वृत्तसंस्था
माणसाचं आयुष्य कधी आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यांचे नशीबच पालटून जातं. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्या घटनेत ११ महिलांचं नशीब पालटलं असून त्या क्षणात करोडपती बनल्या आहेत. महत्वाची बाब म्हणडे केवळ २५० रुपयांमध्ये त्या करोडपती बनल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील ११ महिलांनी काही दिवसांपूर्वी लॉटरीचे तिकिट खरेदी केले होते, त्यानंतर त्यांना करोडो रुपयांची लॉटरी लागली आहे. सुमारे ११ महिलांनी २५० रुपये देऊन लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती.
अडीचशे रुपयांमुळे बनल्या करोडपती –
ग्रीन आर्मीच्या अकरा महिला सदस्यांनी केरळमधील मलप्पुरम येथील परप्पनगडी नगरपालिकेत मान्सून बंपर लॉटरी जिंकली आहे. या महिलांनी लॉटरीत १० कोटी रुपये जिंकले आहेत. यापैकी ९ महिलांनी २५ रुपये जमा केले होते तर इतर दोन महिलांनी उर्वरित लॉटरीचे पैसे दिले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या महिला गेल्या अडीच वर्षांपासून कचरा वेचण्याचे काम करत होत्या. या महिला पालिकेतील ५७ सदस्यांच्या HKS गटाचा भाग आहेत.
११ महिलांनी मिळून खरेदी केले होते तिकिट –
दहा कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यानंतर आता आपला व्यवसाय चालवणार असल्याचे महिलांनी सांगितलं आहे. त्यांनी एकत्र लॉटरी जिंकल्यामुळे आता त्या एकत्र काम करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. लॉटरीची तिकिटे पी पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालू आणि पी लक्ष्मी यांनी खरेदी केले होते. लॉटरी जिंकल्यानंतर महिलांचा आनंदाला पारावार उरला नव्हता. लॉटरी जिंकलेल्या एका महिलेने सांगितले की, आम्ही याआधीही लॉटरीची तिकिटे काढली होती, पण इतके मोठे बक्षीस पहिल्यांदाच जिंकले आहे. आणखी एका महिलेने सांगितले की, आम्ही आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होतो, या लॉटरीच्या तिकिटामुळे आम्हाला खूप आधार मिळाला आहे.