विठ्ठल ममताबादे
उरण : रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात बसला. याच तडाख्यात उरणमधील ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा असलेल्या द्रोणागिरी पर्वताला सुद्धा अतिवृष्टीची झळ बसली. मोठ्या प्रमाणात द्रोणागिरी पर्वत येथे भूस्खलन झाले आणि त्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव बेघर झाले. या आदिवासी बांधवांची सध्या राहण्याची सोय डाऊरनगर येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये करण्यात आलेली आहे.

या बांधवांचे दुःख दूर करण्याच्या व मदतीचा हात पुढे करण्याच्या अनुषंगाने शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट उरण पुढे सरसावली. गुरुवार, दि. २७ जुलै आणि शुक्रवार, दि. २८ जुलै रोजी शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आदिवासी बांधवांना अन्नवाटप करण्यात आले. हे सर्व बांधव पोटभर जेवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू अन्नदाता सुखी भव असे म्हणत होता. यावेळी शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड. आकांशा ठाकूर, उपाध्यक्षा अॅड. अंतरा पडते, खजिनदार अॅड. वैभव म्हात्रे, सचिव अॅड. चेतन लोखंडे, कायदेशीर सल्लागार अॅड. वैजयंती म्हात्रे, सदस्य निलेश कांबळे, शुभांगी थळी, नितीन घरत (बद्री) उपस्थित होते. आदिवासी बेघर झालेल्या कुटुंबातील व्यक्तींच्या सुख दुःखात सहभागी होत शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आदिवासी बेघर झालेल्या व्यक्तींच्या सुख दुःखात सहभागी होत शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकी सोबत खऱ्या अर्थाने माणुसकी जपली आहे.