पावसाळ्यात संपर्क साधणार कसा?
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यात चार दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आता पावसाने उघडीप दिल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, दुर्गम भाग म्हणून बोर्लीपंचतन परिसरातील ९ गावांचा मोबाईलवरून होणारा संपर्क तुटला आहे. नेटवर्क मिळण्यासाठी सामान्यांनी मारलेली हाक, सहा दिवस होऊनही अद्याप अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली नाही.
तालुक्यातील कासारकोंड, धनगरमलई, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी, वावेपंचतन अशी एकूण ९ गावे एका बाजुला डोंगराळ भागात वसली आहेत. या गावांना शहरांच्या संपर्कात येण्यासाठी बीएसएनएल कंपनीचे टॉवर याठिकाणी बसवण्यात आले. एकच सेवा मिळत असल्याने याच्यावर अवलंबून राहून ग्रामस्थांना वारंवार होणाऱ्या नेटवर्कबाबतच्या अडचणीमुळे येथील मोबाईलधारकांना बीएसएनएल सेवा ही त्रासदायक बनली आहे.
सद्या पावसाळी दिवस सुरू आहेत. त्यात शासनाकडून अतिवृष्टीचा इशारा देखील मिळत आहे. येथील गावांची १६०० हुन अधिक लोकसंख्या असून अनेकजण कामानिमित्त मुंबईस्थित असल्याने कित्येक वेळा या आडमार्गावर कोणतीच सुविधा मिळत नाही. या दिवसात अचानक तसा प्रसंग बेतला तर रात्रीबेरात्री कोणत्याही मदतीसाठी आजूबाजूंच्या गावांकडे संपर्क कसा साधावा असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. अशा वेळेला संपर्क होत नसल्याने कंपनीच्या सेवांना स्थानिक नागरिक वैतागल्याचे दिसत आहे.
सुरुवातीपासूनच या यंत्रणेत सातत्याने बिघाड असल्याने हा दुर्गम भाग म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी व वरिष्ठांचे कायम दुर्लक्ष केले. परिणाम काय तर बीएसएनएलची दूरध्वनी सेवा कायमचीच खंडित होत राहिली. अद्यापही या सरकारी कंपनीच्या सेवेवर अवलंबून असलेला ग्रामीण भाग मात्र, त्रस्त झाला आहे.