• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे; जनतेची मागणी

ByEditor

Jul 29, 2023

सलीम शेख
माणगाव :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे लहान-मोठे अपघात तसेच या अपघातांतून अनेकांचे जाणारे जीव व अनेकांना आलेले कायमचे अपंगत्व पाहता हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळाच बनला होता. या महामार्गाची गंभीर अवस्था पाहून गेल्या १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर गेल्या १३ वर्षांपूर्वी पळस्पे ते इंदापूर या जवळपास ९० किलो मीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर इंदापूरपासून पुढे दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या महामार्गाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून कोकण वासीय त्याची यातना भोगत आहेत. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे कामही अजून व्यवस्थित पूर्ण झालेले नाही. इंदापूरपासून पुढे असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील माणगावचा बायपासचा प्रश्नहि खितपत पडला आहे. बायपासच्या कामाची रखडपट्टी यामुळे माणगाव शहरात सातत्याने शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी व सणांच्या दिवशी वाहनांच्या १० किमी पर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. सुट्टीच्या व सणाच्या दिवसांत कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या गाड्या तसेच सणानिमित्त गावाकडे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या येत असतात. माणगाव शहरातून बाहेर पडताना त्यांच्या नाकी दम येते.

सध्या सुरु असलेल्या पावसाच्या मौसमात या महामार्गावर जागोजागी प्रचंड जीवघेणे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांचे वाहन या खड्ड्यांतून आपटून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक लहान मोठ्या गाड्या या खड्ड्यातून आपटून अनेकांना गंभीर दुखापती झालेल्या आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्ष अत्यंत कूर्म गतीने सुरु आहे. महामार्गावर काम करताना केलेली लेन कटिंग बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. अशीच एक लेन कटिंग काही महिन्यांपूर्वी एका कार चालकाच्या रात्रीच्या वेळेस लक्षात न आल्याने माणगाव जवळील रेपोली गावच्या हद्दीत त्या कारला अपघात होऊन कार मधील सर्व १०जण मृत्यूमुखी पडले होते. या अपघाताची भीषणता एवढी होती कि, त्या कारचा चक्काचूर झाला होता. यांसारखे अनेक भीषण अपघात महामार्गावर होत असतानाही लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते या महामार्गाच्या कामाकडे पाहिजे तेवढे गंभीरतेने पाहताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसह अनेक संस्था-संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागत आहेत. या महामार्गाच्या कामासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी मानवी साखळीचे आयोजनही केले होते. परंतु लोकप्रतिनिधी व राज्यकर्ते आंदोलन पाहिल्यावर तेवढ्याच पुरते आंदोलकांना महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे व महामार्गावरील खड्डे चांगल्या प्रकारे बुजविणे याबाबतीत आश्वासित करून निघून जातात. कालांतराने पुन्हा येरे माझ्या मागल्या… महामार्गाची अवस्था जैसी थे अशीच असते. त्यामुळेच या महामार्गाचे काम १३ वर्ष रखडले आहे.

कोकणातील जनता हि संयमी असल्याने याचाच फायदा राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी घेत आहेत. आता ह्या प्रश्नाबाबत कोकणी माणसाचा संयम सुटू लागला आहे. राज्यकर्ते या महामार्गावरून सातत्याने जात असतात. परंतु या प्रश्नाकडे ते गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. या महामार्गाच्या नंतर समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन तो महामार्ग होऊन सुरूही झाला आहे. मग १३ वर्ष उलटूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजून पूर्ण का होत नाही असा सवाल जनतेतून होत आहे. राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी या महामार्गावरून आणखी किती लोकांचा बळी जाण्याची वाट पाहत आहेत असा संतप्त सवालही जनतेतून उठत आहे. निसर्ग वरदान लाभलेल्या या कोकणातील गंभीर अवस्था बनलेल्या या महामार्गामुळे कोकणवासियांना कमीपणा वाटत आहे.

आता राज्यात त्रिशंकू सरकार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट व नुकताच या सरकारमध्ये सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) या तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. त्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे हे देखील अजित पवार यांच्या समवेत आहेत. त्यामुळे आता रायगडचे खा. सुनील तटकरे, मावळचे शिवसेनेचे खा. श्रीरंग बारणे, राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्रीपदी निवड झालेल्या श्रीवर्धन मतदार संघाच्या आ. आदिती तटकरे, पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, पेणचे आ. रवीशेठ पाटील, उरणचे आ. महेश बालदी, कर्जत-खालापूरचे आ. महेंद्र थोरवे, अलिबाग-मुरूडचे आ. महेंद्र दळवी, महाड-पोलादपूर-माणगावचे आ. भरतशेठ गोगावले, विधान परिषदेचे कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. अनिकेत तटकरे, पदवीधर मतदार संघाचे आ. निरंजन डावखरे, शिक्षक मतदार संघाचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे हे सर्व लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. आतातरी या भागातील या लोकप्रतिनिधींनी सत्तेत असल्याचा फायदा घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कसे जलदगतीने पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!