घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिका हद्दीत नियमांचे उल्लंघन करून इमारती उभारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. बिल्डरांकडून नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असून, वर्दळीच्या रस्त्यावरही बांधकाम साहित्य ठेवून रस्त्यांचा वापर अडवला जात आहे. याबाबत लेखी तक्रारी करूनही नगररचनाकार अधिकारी बिपिन निकम उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नगरपालिकेने शहरातील रस्ते बिल्डरांना आंदण दिल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

बांधकामांमध्ये नियमांचे उल्लंघन
उरण नगरपालिका हद्दीतील अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामे सुरू असून, काही ठिकाणी तर कायद्याच्या चौकटीतही हे होत असल्याचे दिसून येते. माहितीच्या अधिकारात (RTI) विचारणा केल्यानंतरही माहिती दिली जात नाही किंवा ती उपलब्ध नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली जाते. आनंदनगर, कामगार वसाहत, विमला तलाव, भिवंडीवाला गार्डन या ठिकाणी नवीन इमारती उभारताना, नियमानुसार बांधकाम करताना रस्ता सोडणे आवश्यक असते. मात्र, नव्या इमारती जुन्या इमारतींपेक्षा बाहेर वाढवून बांधल्या जात आहेत. तसेच, काही बिल्डरांनी कोणतीही परवानगी न घेता शेकडो झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये १०० वर्षांहून जुनी झाडेही असल्याची माहिती समोर येत आहे.
रस्त्यावर बांधकाम साहित्याचा अडथळा
बिल्डरांकडून इमारती उभारताना लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जात असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. बिल्डरांकडून हे काम त्रैबंक भगवान खंदारे (पिंट्या) व त्याचे सहकारी यांच्याकडून सुरू असून, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिकेकडे लेखी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्याऐवजी “बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ता मोकळा केला जाईल” असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेनेच उरणमधील रस्ते बिल्डरांना आंदण दिल्याचे स्पष्ट होते.
जनतेत नाराजी, जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.