मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलाय. यावेळी महायुती सरकारकडून कृषी, महिला, औद्योगिक, पर्यटन, रस्ते आणि इतर क्षेत्रांसाठी घोषणांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालंय. परंतु अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय. उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय. आज महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मागील 10 वर्षांमधील सर्वात बोगस अर्थसंकल्प आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.
आज सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प बघून मला आचार्य अत्रेंची आठवण झाली आहे. आज अत्रे असते तर म्हणाले असते, असा बोगस अर्थसंकल्प मी मागील 10 हजार वर्षांत पाहिलेला नाही. उद्याचा सूर्य उगवेल, सर्वांना प्रकाश मिळेल आणि त्यातून सर्वांना व्हिटॅमिन बी सुद्धा मिळेल अशा आशयाचं आजचं बजेटचे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या काळामध्ये वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या. जाहिरनाम्यामधील थापांपैकी एकतरी गोष्ट आजच्या अर्थसंकल्पात केलीय का? लाडक्या बहिणींना 2100 रूपये दिलेत का? शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीय का? असे सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
ते म्हणाले की, मी नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कार्यक्रम जाहीर करून त्यावेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती केली होती. परंतु आजच्या अर्थसंकल्पात ते झालेलं नाहीये. प्रत्येकाला अन्न आणि निवारा ही सत्ताधारी सरकारची घोषणा होती. जिवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील स्थिर ठेवण्यात येणार होत्या. मग त्या कोण ठेवणार? एवढं बहुमत असून देखील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहत नसतील, तर तुमच्या बहुमताला कोण विचारणार? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.