मुंबई : सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी आता महायुतीकडून उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 5 पैकी भाजपला 3 आणि शिंदे- अजित पवारांना प्रत्येकी एक-एक असं जागा वितरण करण्यात आलं आहे. त्यात आता भाजपकडून तीनही नावं निश्चित करून दिल्लीमध्ये पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले महायुतीच्या उमेदवारांनी आपल्या विधानपरिषदेच्या आमदारकीच्या राजीनामा दिल्याने या 5 विधानपरिषदेच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तर आता उमेदवारी अर्ज भरण्याची सुरूवात झाली आहे. त्यासाठी भाजपच्या तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र भाजपकडून माधव भंडारी यांच्यासह दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर या तीन निष्ठावान नेत्यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांची नावं दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीमध्ये झिशान सिद्दिकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते हे सर्व इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादीकडे केवळ एकच जागा असल्याने ही जागा मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे.
10 मार्चपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर 17 मार्च हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 18 मार्चला या अर्जांची छाननी होणार असून 20 मार्चला उमेदवारांना त्यांच्या अर्ज मागे घेण्याची शेवटची संधी असेल. तर 27 मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. तसेच मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहेत.