मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या आनंदाचा शिधा या योजनेला अर्थसंकल्पात निधीच दिला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही योजना बंद झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या आधी शिंदेंनी सुरू केलेली ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थाटन योजनेलाही निधी दिला नाही. शिवभोजन थाळी योजनेचीही तीच स्थिती आहे. त्यामुळे या योजना कागदोपत्री दिसत असल्या तरी त्यासाठी एक रुपयाचाही निधी उपलब्ध नाही.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. त्या योजनांना आता स्थगिती देण्याचं काम फडणवीस करत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या रकमेतही वाढ करण्यात आली नाही.
आनंदाचा शिधा योजना बंद
सणासुदींच्या निमित्ताने राज्यातील रेशनकार्डधारकांना फक्त शंभर रुपयात काही जीवनावश्यक वस्तू देण्यात येत होत्या. त्यामध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक लिटर पामतेल देण्यात येत होतं. या योजनेसाठी गेल्या वर्षी 602 कोटी रुपये खर्च आला होता. पण आता गुढीपाडव्याच्या तोंडावर या योजनेचा लाभ नागरिकांना मिळणार नाही. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेला कोणताही निधी देण्यात आला नाही.
तीर्थाटन योजनेला निधी नाही
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना सुरू केली होती. त्या माध्यमातून महत्त्वाच्या धार्मिकस्थळी ज्येष्ठ नागरिकांना नेण्यात येत होतं. त्याचा लाभ जवळपास आठ हजार नागरिकांनी घेतल्याची माहिती आहे. या अर्थसंकल्पात तीर्थाटन योजनेसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.
शिवभोजन थाळी योजनेसाठी निधी नाही
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी गरिबांसाठी 10 रुपयात शिवभोजन थाळी सुरू केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही योजना कायम ठेवली होती. आता शिवभोजन थाळी योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही.