मुंबई : मुंबईतील एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला अनेक तास डिजिटल अटकेत ठेवल्याचं समोर आलंय. यावेळी त्यांनी महिलेला पटवून दिलं की, तिच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे पीडित महिला खूप घाबरली, तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी तिला तिचे पैसे दुसऱ्या खात्यात पाठवण्याचा सल्ला दिला. फसवणुकीच्या भीतीमुळे महिलेने पैसे नमूद केलेल्या खात्यात जमा केले.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेनं सांगितलं की, 26 डिसेंबर 2024 ते 3 मार्च 2025 दरम्यान घोटाळेबाजांनी तिची 20 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक केली. पीडितेने सांगितलं की, हे संपूर्ण प्रकरण एका फोन कॉलने सुरू झालं होतं. त्या महिलेला एक फोन आला आणि तिला सांगितलं की, तिच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय. काही लोक त्याच्या आधार कार्डने बँकेत नवीन खाते उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. या माणसाने स्वतःची ओळख एक पोलीस अधिकारी असल्याची सांगितली. फसवणूक करणाऱ्याने महिलेला सांगितले की तिच्या आधार कार्डवर एक नवीन खाते उघडण्यात आलंय. ते मनी लॉंडरिंगसारख्या बेकायदेशीर कामांसाठी वापरले जात आहे. जेव्हा महिलेने त्यांच्या शब्दांवर पूर्णपणे विश्वास ठेवला, तेव्हा घोटाळेबाजांनी त्यांचा दुसरा डाव खेळायला सुरूवात केला. घोटाळेबाजांनी तिला कायदेशीर कारवाईची धमकी दिली. जर तिनं त्यांचं ऐकलं नाही तर, तिच्या मुलीसह कुटुंबातील सदस्यांना यात अडकवलं जाईल, अशी देखील धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचं तिच्या लक्षात आलं. मग या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
महिलेच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तिला डिजिटल अटकेत ठेवण्यात आलं होतं. जेव्हा महिलेने सर्व पैसे ट्रान्सफर केले तेव्हा फोन आपोआप डिस्कनेक्ट झाला. महिलेने ताबडतोब तिच्या जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. पोलीस फसवणूक करणाऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.