मुंबई : शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू आणि क्रूर शासक मुलघ बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ही तणावपूर्ण परिस्थिती हाताळताना काही पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. नागपुरमधील या दंगलसदृष्य परिस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी औरंगजेबची कबर हटवण्याबाबत मोठे विधान केले.
नागपूरची दंगल पूर्व नियोजीत होती असे म्हंटले जाते. असे असेल तर गृहखात्याला याची पूर्व कल्पना नव्हती का? आधीच ही दंगल रोखण्याचा प्रयत्न का केला नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. डबल इंजिन सरकार नुसतं वाफा सोडण्याचे काम करत आहे. गुजरातमध्ये जन्माला आलेल्या औरंगजेबला महाराष्ट्र जिंकता आला नाही. औरंगजेबच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण आहे. भाजप आणि केंद्र सरकारला विचारले पाहिजे औरंगजेब तुमचा कोण लागतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करावी. ही थडगी हटवायची असेल तर तात्काळ यावर कारवाई करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात दंगली का घडवल्या जात आहेत? असा थेट प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर सरकार तुमचं आहे ना? असा सवाल उपस्थित करून मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या चार लोकांनी हाता कुदळ -फावडं घेऊन जावं आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा पूर्ण करावी, असं आव्हानही राऊतांनी सरकारला दिलंय..यावेळी औरंगजेबची कबर ही शिवरायांच्या शौर्याचं प्रतिक असल्याचंही राऊत म्हणालेत.
औरंगजेब कबरीच्या वादावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारीच औरंगजेबाचा उदो उदो करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.अयोध्येतील राम मंदिराचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने कबरीचा मुद्दा पुढे आणला असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी राम मंदिराचा कमी औरंगजेबाच्या नामाचा जप अधिक करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
“चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावा”
“औरंगजेब, अफजलखान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना नष्ट करायचे असं वाटत असेल तर तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना सांगा की ज्या औरंगजेबाला मूठमाती दिली, त्या औरंगजेबाच्या कबरीला तुम्ही उद्धवस्त करा. हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावा”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.