नवी दिल्ली: वक्फ सुधारित विधेयक गुरुवारी (3 एप्रिल) मध्यरात्री लोकसभेत बहुमताने संमत झाले. मात्र त्यापूर्वी या विधेयकावर तब्बल 12 तास मॅरेथॉन चर्चा झाली. राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्षापासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापर्यंत जवळपास सर्वच पक्षांनी आपली-आपली भूमिका मांडली.
प्रत्येक पक्षाचे खासदार प्रातिनिधिक स्वरुपात अध्यक्षांनी दिलेल्या वेळेत या विधेयकावर बोलत होते. पण याला अपवाद ठरले ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार सुनील तटकरे. ते या विधेयकावरील चर्चेपासून चार हात लांबच राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून तटकरे यांनी चर्चेत भाग घ्यावा यासाठी यापूर्वी विनंतीही करण्यात आली होती. पण ते चर्चेपासून लांबच राहिले. त्यामुळे त्यांनी मतदान विधेयकाच्या बाजूने केले की विरोधात केले हेही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे भाजपचे नेतेही नाराज झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, तटकरे यांच्या कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. तटकरे पहाटे तीन वाजेपर्यंत सभागृहातच होते. त्यांनी विधेयकाच्या बाजूनेच मतदान केले आहे. पण यात चर्चेत भाग का घेतला नाही यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
राष्ट्रवादीने या विधेयकावर यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष मुस्लीम समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. या विधेयकाबद्दल काही चिंता असतील तर आम्ही तुमच्या चिंता ऐकू. आम्ही अल्पसंख्याकांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आमचे तीन खासदार आहेत आणि मुस्लिमांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही हे आमचे वचन आहे, असे ते म्हणाले होते.