मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात गोरख ठाकूर यांनी मांडल्या उरणच्या समस्या
विठ्ठल ममताबादे
उरण: नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री गणेश नाईक यांनी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी-नवी मुंबई येथे जनता दरबार भरवीला होता. यावेळी विविध भागातून आलेल्या नागरिकांनी वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या मांडल्या. उरणमधील समस्या सुटाव्यात या अनुषंगाने उरण पूर्व विभागातील एनएमएमटीची बससेवा सुरू होण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक ह्यांची खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर ह्यांनी भेट घेतली.
गोरख ठाकूर यांनी मंत्री गणेश नाईक यांना पूर्व विभागात बस सुरु करण्याची व बस फेऱ्या वाढविण्याची मागणी करत निवेदन दिले. त्याप्रसंगी एनएमएमटी (नवी मुंबई परिवन विभाग)चे जनरल मॅनेजर योगेश कडूसकर उपस्थित होते. लवकरच उरण पूर्व विभागातून जुईनगर ते कोप्रोली व कळंबोली ते कोप्रोली ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल असे मंत्री महोदयांकडून सांगण्यात आले.
यावेळी दिवंगत कै. निलेश शशिकांत म्हात्रे ह्याला एनएमएमटी प्रशासनाकडून मदत करण्यात आली म्हणून योगेश कडूसकर (जनरल मॅनेजर एनएमएमटी) ह्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या प्रसंगी कै. निलेशचे काका अविनाश म्हात्रे व भाऊ विनय म्हात्रे हे उपस्थित होते. या जनता दरबारात उरणमधील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी उरणच्या समस्या मांडल्या व त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देखील मिळाले. गोरख ठाकूर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला, मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या या मागणीमुळे उरण तालुक्यातील पूर्व विभागात लवकरच एनएमएमटी बससेवा सुरु होणार आहे. त्यामुळे पूर्व विभागातील जनतेने गोरख ठाकूर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.