ठेकेदाराचा लेटलतीफ कारभार ताडवाडी ग्रामस्थांच्या मुळावर
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील ताडवाडी हि सगळ्यात मोठी वाडी असून या वाडीच्या बाजूलाच मोरेवाडी देखील आहे. ताडवाडीसाठी जल जीवन मिशन योजना संजीवनी ठरणार असल्याच्या बतावण्या करण्यात आल्या होत्या. मात्र या योजनेतला ठेकेदाराचा संथ कारभार आदिवासी ग्रामस्थांच्या मुळावर आला असून लघु पाटबंधारे विभाग ठेकेदाराची पाठराखण करण्यात मश्गुल असल्याचे चित्र आहे. ताडवाडी जल जीवन मिशन योजनेची मुदत मे मध्ये संपली असून ८ दिवसात योजना कार्यरत करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तब्बल २ महिन्यानंतर योजनेची चाचणी घेण्यात आली आहे. तर अद्याप साठवण टाकीला पाईप जोडण्यात आलेले नाही, गावात पाईप टाकण्यात आलेले नाहीत, जलशुद्धीकरण केंद्राचा पत्ता नाही त्यामुळे या महत्वपूर्ण योजनेला घरघर लागली असून आता ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळत आहेत.

कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसते. तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी हि आदिवासी वाडी येते. तालुक्यातील सगळ्यात मोठी हि आदिवासी वाडी असून सुमारे ९०० लोकसंख्या असलेल्या या वाडीत २५०च्यावर कुटुंब राहतात. तर दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ या वाडीला बसते. त्यामुळे दरवर्षी शासनाकडून पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, तरीही पाणी पुरवठा तोकडा पडत असल्याची खंत ताडवाडी ग्रामस्थ व्यक्त करतात. उन्हाळा सरत असताना पाणी टंचाई तीव्र होते. त्यामुळे ताडवाडी येथील आदिवासी लोकांचे पाण्यासाठी हाल सुरु होतात. ताडवाडी आणि मोरेवाडी येथील आदिवासी लोकांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना राबवली जात आहे. मात्र, या कामाचा कालावधी संपला असून संथगतीच्या कामामुळे योजना लांबणीवर पडली आहे.

दरम्यान, निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे येथील महिलांना रात्री विहिरीवर झोपून काढावी लागत असल्याचे भीषण वास्तव प्रसार माध्यमांनी समोर आणले होते. या बातमीची दखल घेत विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय हे दिनांक ३१ रोजी तत्काळ कर्जतमध्ये दाखल झाले. कर्जत तहसिल कार्यालयात दाखल झाल्यावर त्यांनी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, निवासी नायब तहसिलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुजित धनगर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे. तर या योजनेशी आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या योजनेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. अशी थेट तंबी आमदार भारतीय यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. तर यावेळी पुढील ८ दिवसात योजना कार्यान्वित होईल असा शब्द लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला होता.

मात्र या गोष्टीला आता २ महिने सरत आले तरी देखील ठेकेदाराने आपला संथकारभार सुरु ठेवला आहे. सद्यस्थितीत या योजनेच्या उद्भव विहरीत पंप सोडण्यात येऊन उद्भव विहीर ते मोरेवाडी जल साठवण टाकी व टाकी ते ताडवाडी इथपर्यंत पाईप टाकण्यात आले आहेत. तर अद्याप गावात पाईप लाईन फिरवण्यात आलेली नाही. जलशुद्धीकरण केंद्राबाबत स्पष्टता नाही, साठवण टाकीला लाईन जोडण्यात आलेली नाही, तर पाण्याची चाचणी घेण्यासाठी ठेकेदार व लघु पाटबंधारे विभागाला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे आता गावात पाईप लाईन फिरवणे बाकी असल्याने पावसाळा देखील निघून जाऊन ताडवाडी ग्रामस्थांना योजनेच्या पाण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान ठेकेदारांचा संथ कारभार यामुळे योजना लांबट असल्याने आता ग्रामस्थ देखील आक्रमक पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार का दखल?
रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासाठी जल जीवन मिशन योजना हि महत्वाची होती. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या काळात उत्तम काम झाले. तर जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेबाबत त्यांनी अनेकदा कठोर निर्णय घेत योजना योग्य रीतीने पूर्ण करत ग्रामीण भागातील जनतेला आधार देण्याचा प्रयत्न केला. अशात या जुलै महिन्यात त्यांची बदली झाल्याने त्यांच्याजागी डॉ. भरत बस्टेवाड यांनी दिनांक २४ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे ताडवाडीच्या लेटलतीफ कारभाराची डॉ. बास्टेवाड हे दखल घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठेकेदाराने योजनेसाठी लागणाऱ्या पाइपची ऑर्डर दिली होती. मात्र पाईप भेटण्यास उशीर झाल्याने योजना पूर्ण करण्यास विलंब लागत आहे.
– डी. डी. गावित,
शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत
आम्हाला दरवर्षी सांगितले जाते पाणी येईल. मागच्या वेळी गावात नळ पण लावले होते. पण ते नळच आले फक्त पाणी काही आलं नाही. तेव्हा सरकारच्या भरवश्यावर किती बसायचं हा प्रश्न आहे. गावात पाण्याचा त्रास असल्याने कुणी पोरी पण द्यायला तयार होत नाही. आमचा आयुष्य पाणी भरून भरून गेलं.
– मीना तुकाराम आगीवले,
ताडवाडी महिला ग्रामस्थ
प्रत्येक निवडणुकीला पुढारी गावात येऊन गावात नाळ येईल सांगतात. पण आमचं आयुष्य पाणी भरून चाललं. या उन्हाळ्यात बातमी वाचून पुढारी, अधिकारी आले आणि ८ दिवसात नळातून पाणी येईल सांगितलं पण अजून गावात नळ आले नाही. यंदा नळ आले नाही तर आम्ही वाडीचा मोर्चा काढू.
– राही बिर्जू केवारी,
ताडवाडी महिला ग्रामस्थ