उरण तालुक्यातील जसखार येथील धक्कादायक प्रकार उघडकीस
विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील जसखार येथील जमिनी 1984 साली जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी संपादित करण्यात आल्या. त्या वेळेस कै. विठ्ठल तेली ठाकूर यांची सर्व्हे नंबर 16/4,19/2,53/4,105/26,136/5A,191/5A,161/1,214/6,77/6 ही एक एकर तीस गुंठे जमीन मिळकत देखील संपादित करण्यात आली. त्याची अवॉर्ड कॉपी त्यांच्या नावाने आहे, तसेच मेट्रो सेंटर उरण येथून रुपये 40,247/- पेमेंट देखील विठ्ठल तेली ठाकूर यांना करण्यात आले हे देखील स्पष्ट आहे. त्यांना एक मुलगा कै. वामन विठ्ठल ठाकूर आणि एक मुलगी कै. द्वारकाबाई रामदास मढवी (पूर्वाश्रमीची द्वारकाबाई विठ्ठल ठाकूर) असे फक्त दोन वारस होते. जेएनपीटीचे 12.5% विकसित भूखंड मिळविण्यासाठी सन 2010 मध्ये कै. वामन विठ्ठल ठाकूर आणि त्यांचे तीन मुलगे प्रकाश, संदीप, दिनेश यांनी वारस दाखला मिळवण्यासाठी उरण दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता व त्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस देखील प्रसारित केली होती. त्या अर्जात आणि जाहीर नोटीसमध्ये कै. विठ्ठल तेली ठाकूर यांचा मी एकच वारस असून मला कोणीही भाऊ किंवा बहीण नाही असे सांगितले होते. परंतु ही गोष्ट कै. द्वारकाबाई रामदास मढवी यांना समजल्यावर उरण कोर्टात त्या अर्जा विरोधात हरकत घेण्यात आली. उरण कोर्टाने कै. वामन विठ्ठल ठाकूर आणि त्यांचे तीन मुलगे प्रकाश, संदीप, दिनेश यांनी केलेला अर्ज फेटाळला. कालांतराने द्वारकाबाई, वामन या दोघांचेही निधन झाले.
जेएनपीटीचे 12.5% विकसित भूखंड लाटण्यासाठी प्रकाश वामन ठाकूर, दिनेश वामन ठाकूर आणि कुटुंबीय यांनी परस्पर एका बिल्डरशी संगनमत साधून सदरहू भूखंडाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जसखार गावात चर्चा सुरू झाली आणि ही बातमी कै. द्वारकाबाई रामदास मढवी यांच्या वारसांना समजली. सदरहू मढवी कुटुंबीयांनी एकत्र येवून सर्व ठाकूर कुटुंबीयांना दिनांक 30/07/2023 रोजी फोन करून समजावून सांगितले की, काहीही केले तरी वारस म्हणून सर्व कायदेशीर वारसांची नावे लागतील तरी आपण सर्वांनी शांतपणे विचार करून आपला निर्णय कळवावा, अन्यथा आम्हाला आमचा कायदेशीर मार्ग मोकळा असेल. कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्यानंतर त्याची कल्पना न देताच कायदेशीर मार्ग का अवलंबला म्हणून आम्हाला दोष देवू नये असे मढवी कुटुंबियांनी ठाकूर कुटुंबियांना कळविले. त्यावर कै. वामन ठाकूर यांच्या कुटुंबीयांनी द्वारकाबाई हीच्या नावाची नोंद ह्या जमिनी संदर्भातील कोणत्याही दप्तरी नाही असे सांगून, तुम्हाला जे काय करायचे असेल ते करून घ्या असे मढवी कुटुंबियांना सांगितले. ठाकूर कुटुंबीय प्रेमाने सांगितलेले ऐकत नसल्याने मढवी कुटुंबीय यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपर्यंत कै. वामन विठ्ठल ठाकूर यांच्या कुटुंबीयांनी द्वराकाबाई हिला कोणतीही जमीन तर दिलीच नाही तसेच तिला आणि तिच्या कोणत्याच मुलाला आणि मुलींना आजपर्यंत एक रुपयाचीही मदत केलेली नाही. अशोक मढवी हे जेएनपीटीमध्ये त्यांचे वडील रामदास मढवी यांच्या जमिनीमुळे प्रकल्पग्रस्त दाखल्यावर नोकरीला लागले असून भरत मढवी हे स्वतः मेरिटवर लागले आहेत. कै. वामन विठ्ठल ठाकूर यांनी एकुलत्या एक बहिणीला भेटवस्तू सोडाच पण भाऊबीज देखील केलेली नाही असे मढवी कुटुंबियांकडुन समजले. या संदर्भात कै. वामन विठ्ठल ठाकूर यांचे पुत्र प्रकाश वामन ठाकूर यांना संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, द्वारकाबाई ह्या कायदेशीर वारस नसून त्यांचा कै. विठ्ठल तेली ठाकूर यांच्या जेएनपीटीकडून वितरित होणाऱ्या 12.5%, विकसित भूखंड संदर्भात कोणताही संबंध नाही. द्वारकाबाई यांची सर्व मुले आमच्याकडे जेवांयला, रहायला होती आणि आमच्याकडेच लहानाची मोठी झाली आहेत. आम्ही त्यांना नेहमीच मदत केली आहे. द्वारकाबाई हिला तिच्या वाट्याची शेतजमीन आम्ही दिलेली आहे. त्यांची मुले त्या शेतजमिनीमुळे मिळालेल्या नोटीसवर जेएनपीटीमध्ये नोकरीला लागले आहेत असे प्रकाश ठाकूर यांनी सांगितले.
खात्रीलायक सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, कै. वामन विठ्ठल ठाकूर यांच्या मुलांनी त्यांच्या आई कडील बोकडरा येथील 12.5% जेएनपीटीचे विकसित भूखंड आईकडील हक्क दाखवून मिळविले आहेत. मग द्वारकाबाईचे हक्क देण्यास नकार का देत आहेत? अशी चर्चा संपूर्ण जसखार गावात सुरू आहे. |