रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘स्वातंत्र्यपूर्व काळ चांगला होता’ म्हणत उपोषणाचा एल्गार!
घन:श्याम कडू
उरण : “स्वातंत्र्यपूर्व काळ चांगला होता!”, ८९ वर्षीय अनंत परदेशी यांनी प्रशासनाच्या फसव्या आश्वासनांमुळे टाकलेली ही आर्त हाक संपूर्ण व्यवस्थेचं अपयश अधोरेखित करते. गेल्या १२० दिवसांपासून उरण तालुक्यातील परदेशी वस्ती पाण्याविना होरपळत आहे, आणि अखेर आता १ मे रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिक अनंत परदेशी त्यांच्या कुटुंबासह न्याय मिळवण्यासाठी वणवण भटकत आहेत. शासन निर्णय, कोर्टाचे आदेश, स्थानिक पातळीवरील पाहण्या, आश्वासन पत्रे सर्व काही असूनही पाणी मिळत नाही. १७ मार्चच्या लेखी आश्वासनांनंतरही २० मार्चपर्यंत प्रश्न सुटला नाही. प्रशासकीय दुर्लक्ष आणि बेकायदेशीर पाणी कमिटीचा दबाव ही परिस्थिती अधिक गंभीर करत आहे. यामध्ये २० दिवसांपासून परदेशी वस्ती पाण्याविना आहे. बेकायदेशीर पाणी कमिटीचा मनमानी कारभार, पोलीस, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणताच मार्ग निघत नसून प्रशासनाविरोधात ८९ वर्षीय अनंत परदेशी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. परदेशी यांनी १ मे रोजी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
परदेशी कुटुंब आणि गावकरी प्रशासनाच्या आश्वासनांची चिरफाड करत म्हणत आहेत “हे आश्वासन नव्हे, फसवणूक आहे”, १ मे रोजी होणाऱ्या या उपोषणाकडे प्रशासनाने वेळेत लक्ष दिलं नाही तर कायदा सुव्यवस्थेचा भंग होण्याची जबाबदारी पूर्णतः अधिकाऱ्यांवरच असेल, असा इशारा देण्यात आला आहे.