असे सुशोभिकरण कोणाच्या कामाचे? प्रवाशी वर्गातुन संतप्त प्रतिक्रिया
पनवेल ते वीर लोकल सुरु करण्याची मागणी
विश्वास निकम
कोलाड : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रायगड जिल्ह्यातील कोलाड व वीर रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्याचे उद्घाटन ६ सप्टेंबर २०२४ रोजी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु, याच कोलाड स्थानकात फक्त दादर-रत्नागिरी एकच पॅसेंजर गाडी थांबते असून दुसरी गाडी दिवा-सावंतवाडीचा थांबा कोरोना काळापासून बंद करण्यात आला आहे. ती अद्याप सुरु न झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे हाल होतांना दिसत आहेत. मग हे सुशोभिकरण कोणाच्या कामाचे?अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत असुन वीर कोलाड ते पनवेलपर्यंत लोकल सुरु करण्याची मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.

कोकणात रेल्वे सुरु करण्यासाठी १९७७ साली मधु दंडवते रेल्वे मंत्री असतांना कोकण रेल्वेचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ई. श्रीधरन यांना कोकण महामंडळाचे अध्यक्ष नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या महामार्गाचे काम सुरु झाले. यानंतर १९८९ ते १९९० मध्ये रेल्वेमंत्री जॉज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला चालना दिली. कोकणचा विकास व्हावा यासाठी पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांनी कोकण रेल्वेसाठी दिल्या. कोकण रेल्वेही सुरु झाली. जेथे कोकण रेल्वे सुरु झाली त्या कोकण रेल्वेच्या पहिल्याच स्टेशनला रो-रो सेवा सुरु झाली व धनदांडग्यांचा प्रश्न सुटला. परंतु सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी एकच गाडी थांबत असल्यामुळे प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोलाड हे व्हाईट वॉटर राप्टिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण असुन बाजूला कुंडलिका नदी, हिरवागार निसर्ग, धबधबे, सह्याद्रीची नयनरम्य पार्श्वभूमी यासाठी ओळखले जाणारे कोलाड. तसेच कोलाड परिसरातील गोवे येथे असणारे श्रीमती गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेज असल्यामुळे येथे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. याच कॉलेजच्या बाजुने कोकण रेल्वे गेली आहे. परंतु येथे लोकल सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
कोलाड परिसरात वाडया-वस्त्या धरून ७१ गावांचा समावेश होतो. येथून मुंबई जवळ असल्यामुळे पनवेल-कोलाड ते वीर पर्यंत लोकल सेवा सुरु झाली तर उद्योगधंद्याना चालना मिळेल. गृहिणी तसेच विद्यार्थी यांना पार्टटाईम नोकरीही करता येईल. तसेच कोलाडपासून पुणे हे नजिकचे ठिकाण असुन पुणे मार्गाकडे जाणाऱ्या लोकांचाही फायदा होईल. सर्व बाबींचा विचार करता रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल व तरुणांना रोजगार मिळाले. यामुळे दिवसातून तीन वेळा पनवेल-कोलाड ते वीरपर्यंत लोकल रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.